बारामती/ जळोची : बारसू प्रकल्पात उद्योगमंत्री व प्रशासनासोबत माझ्याही दोन बैठका झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या हिताची जपणूकही होईल. राज्याच्या विकासालाही चालना मिळेल, असा मार्ग कसा काढता येईल, असा प्रयत्न होता. पर्यावरण व शेतीचे नुकसान न करता काय मार्ग काढता येईल, यासाठी पूर्ण तयारी करुन स्थानिकांना विश्वासात घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. पोलीस बळ वापरुन प्रकल्प यशस्वी होणार नाही, असा सूचक इशारा शरद पवार यांनी राज्य सरकारला दिला.
बारामीत गोविंदबागेत ते पत्रकारांशी बोलत होते. शरद पवार यांनी देशपातळीवरील राजकीय भूमिका, संघटन, विरोधकांची भूमिकेबाबत सविस्तरपणे मत मांडले.
पवार म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशपातळीवर विरोधकांची एकजूट होण्याची प्रक्रीया सुरु झालेली असताना मी बाजूला होणे योग्य नाही, असे अनेक मान्यवरांचे मत आले. कार्यकर्त्यांची तीव्र भावना विचारात घेतल्याने मी अध्यक्षपदावरुन दूर होण्याचा निर्णय मागे घेतला आहे.
दरम्यान, भाजपला पर्याय देण्यासाठी जे प्रयत्न सुरु आहेत, त्यात आपला सहभाग असेल असेही पवार यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, अध्यक्षपदाच्या भूमिकेपासून दूर जाण्यासाठी तयार झालो होतो. गेल्या साठ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी लोकसभा, विधानसभा, राज्यसभा यापैकी कोठेतरी काम केले आहे. देशात सातत्याने 56 वर्षे अशा पद्धतीने निवडून आलेले लोक मला तरी माहिती नाहीत. बारामतीसह राज्य व देशातील लोकांनी आशीर्वाद दिल्यानेच मी 56 वर्ष सक्रीय राजकारण करु शकलो. माझी अजूनही राज्यसभेची तीन वर्षे शिल्लक आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मला असे वाटत होते की, आपण पर्याय तयार करणे गरजेचे आहे. अनेक वर्षांपासून मीच जबाबदारी घेतो आहे. पण नव्या लोकांना संधी द्यायला पाहिजे. त्यांनीही जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे मला वाटत होते. मी बाजूला होणे, याचा अर्थ घरी बसणे असा नाही. लोकांत, कार्यकर्त्यांत राहणे, त्यांचे प्रश्न सोडवणे, हा मनाशी निश्चय करुन मी अध्यक्षपदावरून दूर होण्याचा निर्णय घेतला होता.पक्षाच्या कार्यकर्त्यांची इतकी तीव्र प्रतिक्रिया येईल, असे मला कधी वाटले नाही, वर्षभरात लोकसभेच्या निवडणुका आहेत. मी विरोधकांची एकी होताना मी बाजूला होणे योग्य नव्हते.
अजित पवारांचे काम उपयुक्त
अजित पवार यांच्याबाबत सातत्याने चर्चा होतात, असे विचारले असता, पवार म्हणाले की, काही लोकांच्या कामाच्या पद्धती असतात. मी वेळ असेल तेव्हा माध्यमांना वेळ देतो. अजित पवार यांना प्रसिध्दीची कधीच चिंता नसते तर हातात घेतलेले काम पूर्ण करण्याची त्यांना चिंता असते. ते राष्ट्रवादीचेच काम करीत असून राज्य व पक्षासाठी त्यांचे काम अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत वेगळी चर्चा नको, असे सांगून पवार यांनी अजित पवार यांच्या विषयावर पडदा टाकला.