मुंबई – भिवंडीतील वळपाडा भागात तीन मजली इमारत शनिवारी दुपारी कोसळल्याची दुर्घटना घडली. यात 3 जणांचा मृत्यू झाल आहे. तर 9 जण जखमी झाले. अद्यापही काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ, टीडीआरएफसह इतर यंत्रणांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीच्या कैलास नगर भागातील वलपाडा परिसरात ‘वर्धमान कंपाऊंड’ नावाची तीन मजली इमारत होती. या इमारतीच्या खाली एक गोदाम होते. तर वरच्या दोन मजल्यावर रहिवासी राहत होते. मात्र, आज दुपारी दीडच्या सुमारास अचानक ही इमारत कोसळली.
या दुर्घटनेत सोना मुकेश कोरी (वय 5) नवनाथ सावंत ( वय 35) आणि ललिता रवी मोहतो (वय 29) या तिघांचा मृत्यू झाला आहे. तर जखमी व्यक्तींवर भिवंडीतील आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर या इमारतीचे मालक इंद्रपाल पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर ठेकेदाराचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री दुर्घटना स्थळाला भेट दिली. तसेच त्यांनी भिवंडी येथील इंदिरा गांधी रुग्णालयालाही भेट दिली. यावेळी त्यांनी या इमारत दुर्घटनेत जखमी झालेल्या मजुरांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली आणि त्यांना धीर दिला. त्यानंतर त्यांनी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री साहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच जखमींवर शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचनाही दिल्या.