पुणे -शिवाजी महाराजांसारखे महापुरूष आणि गडकिल्ल्यांची नावे घेऊन आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची, हेच सध्या सुरू असल्याची खंत छत्रपती संभाजीराजे यांनी रविवारी व्यक्त केली.
सहाय्यक पोलीस आयुक्त सूरज गुरव यांनी लिहिलेल्या “बायफोकल्स पब्लिकेशन्स’तर्फे प्रकाशित “माझं गडप्रेम’ या पुस्तकाचे प्रकाशन छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक प्रा. प्र. के. घाणेकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, बिनतारी संदेश विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, उप-वनसंरक्षक राहुल पाटील, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक चरणसिंह राजपूत, अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे आणि पुरातत्व संशोधक तसेच दुर्ग अभ्यासक डॉ. सचिन जोशी आदी उपस्थित होते.
सरकार कोणाचेही असो आणि सरकार कुठलेही असो महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे जतन आणि संवर्धनासाठी त्यांनी काय केले, हा प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे. किती नेते गडकिल्ल्यांविषयी आस्था बाळगून आहेत आणि त्यांनी गडकिल्ल्यांवरून पदभ्रमण केले आहे, हा संशोधनाचा विषय असल्याची टीकाही संभाजीराजे यांनी केली.
इतिहासाला बाधा न पोहोचवता शिवाजी महाराजांचा इतिहास गाडला जाणार नाही, याची दक्षता घेऊन किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे, असे संभाजीराजे म्हणाले. शिवराज्याभिषेकाचे यंदा 350 वे वर्ष सुरू आहे. त्यानिमित्ताने तरी गडकिल्ले संवर्धन क्षेत्रात विविध माध्यमातून काम करणाऱ्या हातांचा सरकारकडून सत्कार व्हावा, अशी अपेक्षा घाणेकर यांनी व्यक्त केली. लेखक गुरव, तांबे, बनसोडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
मी स्वतः मार्गदर्शक होईन
रागयड किल्ल्यावर सुरू असलेले शास्त्रोक्त जतन आणि संवर्धन पाहण्यासाठी महाराष्ट्रातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने यावे. मी स्वतः त्यांचा गाईड आणि मार्गदर्शक होऊन शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा त्यांना कथन करेन, असेही छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले.