मुंबई – महाराष्ट्रातील राजकीय संकट जसजसे गडद होत चालले आहे. महाविकास आघाडीचे सरकार जाऊन आता तब्बल दहा महिने पूर्ण होताहेत. सत्ता संघर्षाने राजकीय वातावरण चांगले तापले आहे. शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्यात ठीक ठिकाणी सभा देखील घेतल्या. यानंतर आता उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरून कोकणात जाहीर सभा घेणार असल्याचे जाहीर केले. अशात आता उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या सुद्धा मैदानात उतरणार आहे.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणीत भरच पडली. यातच शिंदे गटाला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पक्षातील पडझड रोखण्यासाठी आणि पक्षबांधणीसाठी आता रश्मी ठाकरे सुद्धा सभेत सहभागी होणार आहे.
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे गेल्या कित्येक दिवसांपासून नेते कार्यकर्त्यांसह जनतेशी संवाद साधतांना दिसत आहे. ठाकरे कुटुंबातील जवळपास प्रत्येक सदस्य राजकीय मैदानात उतरताना दिसत आहे. अशातच आता उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे नाशिकमध्ये स्वतः मेळावे घेणार आहे. संजय राऊत यांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये महिला मेळाव्यातून रश्मी ठाकरे करणार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. रश्मी ठाकरेंचा हा पहिला राजकीय दौरा असणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेची डागडुजी व पदाधिकार्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी रश्मी ठाकरे नाशिकचा दौरा करणार असल्याचे सांगितले जात आहे.