पिंपळे गुरव, दि. 29 – राजमाता जिजाऊ उद्यानाला लागून महापालिकेची पाण्याची टाकी आहे. या परिसरात चूल पेटविल्याने तसेच कचरा जाळत असल्याने उद्यानात मोठ्या प्रमाणावर धूर पसरत आहे. त्यामळे परिसरातील प्रदूषणात वाढ झाली आहे. धुराच्या लोटामुळे उद्यान परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना धुराचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे उद्यानात फेरफटका तसेच नियमित व शारीरिक व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
महापालिकेच्या शासकीय जागेत पाण्याच्या टाक्या नव्याने उभारल्या आहेत. लाखो रुपये खर्च करून टाक्यांना संरक्षक भिंत उभारून झाडे, झुडपे, केबिन, स्वच्छतागृह, प्रवेशद्वार आदींचे सुशोभीकरण करून उभारण्यात आले आहे. मात्र, याठिकाणी सुरक्षारक्षक उपलब्ध नसल्याने येथील परिसरात अन्य कुटुंब वास्तव्य करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे सकाळी चूल पेटविली जाते तर एकीकडे कचरा गोळा करून तो जाळण्यात येत आहे. त्यामुळे हवेमुळे उद्यानात धूर पसरून मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होत आहे.
उद्यानात पहाटे पाचपासूनच परिसरातील नागरिक फेरफटका, नियमित शारीरिक व्यायाम करण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात. उद्यानातील शुद्ध नैसर्गिक हवा शारीरिक दृष्ट्या आरोग्यास उपयुक्त ठरते. मात्र धुरामुळे होत असलेल्या प्रदूषण आरोग्यास हानिकारक ठरत आहे. परिसरात वास्तव्य करीत असलेल्या नागरिकांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
दंडात्मक कारवाईची गरज
उघड्यावर कचरा जाळणे हा पर्यावरण संरक्षण कायदा आणि भारतीय दंड विधानानुसार गुन्हा आहे. त्यासाठी कठोर दंडात्मक तरतूद करण्यात आली आहे. मात्र, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शासकीय जागेतच कचरा एकत्रित गोळा करून तो जाळून प्रदूषण करण्यात येत आहे. यावर संबंधित प्रशासन कारवाई करणार का? असा प्रश्न येथील नागरिक करीत आहेत. शहरात देखील मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी कचरा जाळण्यात येत आहे. परंतु महापालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने प्रदूषणात वाढ होत आहे.
अवैध घटनांचे माहेर
महापालिकेच्या जागेत एखादे कुटुंब कुणाची परवानगी घेऊन वास्तव्य करीत आहे. हे कितपत योग्य आहे. महापालिका या ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षारक्षकाची नेमणूक का करीत नाही? सुरक्षारक्षक नसल्यामुळे येथील जागेत दिवसा ढवळ्या, रात्री अपरात्री अनेकांचे दिवसेंदिवस फावत चालले आहे. येथील परिसरात मद्याच्या बाटल्या, प्लॅस्टिक बाटल्या इतरत्र पडलेल्या दिसून येत आहेत. एखादी अघटित घटना घडून गेल्यास याला जबाबदार कोण असाही सवाल करण्यात येत आहे. महापालिकेने येथे वास्तव्य करणाऱ्यांना त्वरित येथून बाहेर काढावे. तसेच कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.