मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणात त्यांची खासदारकी गमवावी लागली आहे. त्यानंतर काँग्रेसमधून एकच नाराजीचा सूर उमटू लागला आहे. कालच राजघाटावर काँग्रेसकडून सत्याग्रह आंदोलनदेखील करण्यात आले. आता सगळ्यात राहुल गांधी यांनी माफी मागण्यासाठी आपण सावरकर नाही असे विधान केले आणि नव्या वादाला तोंड फोडले. त्याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे (ठाकरे गट) मुखपत्र असणारे सामनामधून त्यांच्या या विधानाचा समाचार घेण्यात आला आहे.
आज प्रसिद्ध झालेल्या सामानाच्या अग्रलेखातून सावरकरांविषयी राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचा खरपूस समाचार घेण्यात आला आहार. काल झालेल्या मालेगावच्या सभेत राहुल गांधी याना उद्धव ठाकरे यांनी सूचना वजा इशारा दिला होता. त्यानंतर आज अग्रलेखातून राहुल गांधी यांनी आजपर्यंत आपण कोणालाही घाबरत नाही आपल्याला तुरुंगात टाकले तरी आपण आपले प्रश्न विचारात राहू असे नेहमी म्हणत आले आहेत. परंतु त्यांना स्वतःसोबत त्यांच्या संपूर्ण पक्षाला त्यांच्यासारखे निर्भय बनवणे गरजेचं आहे. माफी मागण्यासाठी माझं आडनाव सावरकर नाही गांधी आहे, असे प्रत्येकवेळी बोलून तुम्ही निर्भीड आहेत हे सिद्ध होणार नाही आणि वीर सावरकर यांच्याविषयी जनतेच्या मनात असलेल्या श्रद्धेला कोणत्याही प्रकारे तडा जाणार नाही. सावरकर त्यांच्या जागी थोर आहेत सावरकरांना विनाकारण ‘माफीवर’ वगैरे दूषणे लावून लढण्याचे बळ कुणाला मिळणार नाही”, असे म्हणत राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
पुढे अग्रलेखात सावरकराविषयी केलेल्या वक्तव्यावर, “सावरकरांनी ज्याप्रमाणे इंग्रजांविरुद्ध अनेक योद्धे उभे केले तसे प्रखर योद्धे राहुल गांधी यांना स्वतःच्याच पक्षात आधी उभे करावे लागतील. मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावली हा अन्याय आहे, पण वीर सावरकरांची मानहानी करून ते ज्या सत्यासाठी लढू पाहत आहेत, त्या सत्याचा विजय होणार नाही. राहुल गांधी हे शहीदांच्याच कुटुंबात जन्मास आले. पण वीर सावरकर, त्यांचे बंधू बाबाराव सावरकर व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने राष्ट्रासाठी तितकाच महान त्याग केला. त्या महान त्यागाची अवहेलना कुणालाच करता येणार नाही”, असे म्हणत उद्धव ठाकरे गटाने आपली भूमिका स्पष्ट केली.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे आपले दैवत असल्याचे सांगत “राहुल गांधी वीर सावरकरांविषयी जी मानहानीकारक वक्तव्ये करीत आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयी निर्माण झालेल्या सहानुभूतीस ओहोटी लागेल. महाराष्ट्रातील काँग्रेसवाल्यांची तर सर्वात जास्त अडचण झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राच्या गावागावांत वीर सावरकर अनेक स्वरूपात उभे आहेत व ते ताठ कण्याने उभे आहेत”, असे स्पष्टपणे अग्रलेखात सांगण्यात आले आहे.