तळेगाव ढमढेरे-राज्यात जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. परंतु जगाचा पोशिंदा बळीराजालासुद्धा ठराविक वयानंतर पेन्शन मिळायला हवी, असा सूर सोशल मीडियावर उमटत आहे. पेन्शनचा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या व्यथा याची सांगड घातली जात आहे. देशाचा अन्नदाता आणि त्यांचे प्रश्न सोशल मीडियावर चर्चेचा विषय होत आहे.
बळीराजा हा अन्नदाता आहे. अन्न ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे. शेतकरी फळे, फुले, भाजीपाला, मांस आणि इतर पदार्थ आदी विविध पदार्थ तयार करून जे नंतर बाजारात विकले जातात. सर्व घटकांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. निर्यातीक्षम कृषी उत्पादनामुळे जगभरात भारतीय कृषी अर्थव्यवस्थेची ओळख आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी उत्पादनाचा मोठा वाटा आहे. या दृष्टिकोनातून, अर्थव्यवस्थेला बळकट करण्यात शेतकरी महत्त्वाची भूमिका बजावतात.
बळीराजाला वयाच्या पन्नाशीनंतर काम करणे जिकीरीचे जाते. शेतीमालाला हमीभाव नसल्याने कधी फक्त मुद्दल तर कधी मुद्दलसुद्धा मिळत नसल्याने उतरत्या काळात जीवन जगण्यासाठी पैसा जवळ राहत नाही. कर्जाचा डोंगर असल्यामुळे बळीराजाला पोटासाठी पन्नाशीनंतर अन्नासाठी वणवण करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यालासुद्धा वयाच्या पन्नाशीनंतर दरमहा त्यांच्या हक्काची पेन्शन मिळायला हवी.
शेतात शेतकरी राबतो म्हणून आज देशात अन्नसाठा मुबलक आहे. हा अन्नसाठा निर्माण करणाऱ्या व जनतेची नि:स्वार्थी सेवा करणाऱ्या शेतकऱ्याला वयाच्या पन्नाशीनंतर दरमहा पेन्शन मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांनी संप केला तर अन्नसाठ्याचा मोठा तुटवडा निर्माण होऊ शकतो. शेतात काम करायला सरकारला बदली कंत्राटी कामगारसुद्धा मिळू शकत नाही. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीचा प्राधान्याने विचार करावा.
-रमेशराव भुजबळ, शेतकरी.