सातारा – कांदाटी खोऱ्यातील भाग दळणवळणासाठी सोयीस्कर नसल्याने हा भाग अनेक वर्षापासून विकासापासून वंचित होता. आता कांदाटी खोरे एकात्मिक गाव विकास आराखड्याच्या माध्यमातून विविध विकासकामे लवकरच सुरु होणार असल्याने दुर्गम भागाचा कायापालाट होणार आहे. या आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यात तापोळा, बामणोली परिसरात नागरिक व विद्यार्थ्यांसाठी एक बार्ज (तराफा), दोन मोटार लॉंच आणि एक वॉटर टॅक्सी सुरु होणार आहे. या बोटींसाठी पाच कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे.
कांदाटी, तापोळा, बामणोली व महाबळेश्वरचा काही भाग दुर्गम असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात दुर्गम भागातील विकास करण्याच्या उद्देशाने पर्यटन विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार कांदाटी खोरे गाव विकास आराखडा
तयार करण्यात आला आहे. या परिसरातील देवस्थानांना तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी देखील शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. यामध्ये मुख्यमंत्र्यांचे गाव असणाऱ्या दरे येथील उत्तेश्वर देवस्थान तीर्थक्षेत्रास “ब’ वर्गाचा दर्जा मिळण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे.
याचबरोबर चकदेव व पर्वत मंदिराबाबतही प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु असल्याचे आगामी काळात या भागाचा कायापालट होणार आहे. दुर्गम भागातील नागरिक व विद्यार्थ्यांना ये- जा करण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला होता. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने अनेकांना बोटीचा आधार घ्यावा लागतो. काही वेळा बोटी नादुरुस्त अथवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. त्यांची गैरसोय दूर करण्यासाठी एक वॉटर टॅक्सी व दोन मोटार लॉंचसाठी दोन कोटी दहा लाख तर एका बार्जसाठी दोन कोटी 75 लाख निधीला मंजुरी मिळाली आहे. याचबरोबर दुर्गम भागातील नागरिकांसाठी तापोळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करण्याचे आराखड्यात नमूद करण्यात आले आहे.
महाबळेश्वर, तापोळा, बामणोली हे पर्यटनाचे क्षेत्र असल्याने या भागात पायाभूत सुविधांचा विकास करण्याबाबत विविध प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये महाबळेश्वर येथील वेण्णा लेक परिसर, पाचगणी- महाबळेश्वर रस्त्याची कोंडी दूर करण्यासाठी पर्यायी रस्ता करण्यासाठी नियोजन सुरु आहे. या भागातील पर्यटन परिसर क्षमता वाढविण्याचेही काम सुरु आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून याबाबत पुढाकार घेण्यात आला आहे.
आराखड्यात बरेच काही
दुर्गम भागातील मुलभूत सुविधांना प्राधान्य
परिसरातील तीर्थक्षेत्रांचा विकास करणे
पाणी, स्वच्छता आणि ट्रेकींगसाठी सुविधा
झऱ्याचे स्त्रोत टिकविण्यासाठी उपाययोजना
रेस्क्यू बोटींसह प्रवाशांच्या बोटींची खरेदी
वॉटर ऍम्ब्युलन्स, दुर्गम भागात आरोग्य उपकेंद्र