मार्च महिना वसंत ऋतूच्या बहराचा आणि कहराचा. खरे तर त्याला “वसंतात्मा’ म्हटले पाहिजे. माणसाच्या शरीराचं दर सात वर्षांनी नूतनीकरण होतं, असं म्हणतात. वसंत ऋतू तर झाडांचं नूतनीकरण प्रतिवर्षी करून टाकतो. कात टाकलेल्या सापाच्या शरीराचं नवं चकाकतं, सळसळतं चैतन्यदायी रूप जसं डोळ्यांना सुखावून टाकतं, तशी वसंतात झाडं नवनवोन्मेषानं फुलून येतात.
सर्जनशील असणं हे माणसाचं आणि झाडाचं समान वैशिष्ट्य आहे. माणसाला फुलांची आवड, ओढ का असते? कवी ग्रेस म्हणतात- माणसाच्या मेंदूलाच वसंतनाद असतो, म्हणून तो मोगऱ्याची मागणी करतो. 15 फेब्रुवारी ते 15 मार्च या काळातला वसंत पूर्ववसंत असतो. उरलेला वसंत हा उत्तरवसंत. पूर्ववसंत हा आंब्याच्या फुलांचा, पळसाचा तर उत्तर वसंत हा अमलतास आणि गुलमोहराच्या भडक फुलांचा. पूर्ववसंत हा सुगंधोत्सव असतो, तर उत्तरवसंत हा रूपोत्सव.
फळांचा राजा आंबा आणि आंब्यांचा राजा हापूस. भारतात आहेत तितकी आंब्यांची झाडं दुसऱ्या कोणत्याही देशात नाहीत. संस्कृत कवींना आंब्याच्या रसापेक्षा गंध अधिक प्रिय आहे. आम्रमंजिरीच्या दर्शनाने व सुगंधाने स्त्री- पुरुषांच्या अंगी उन्माद संचारतो (असे म्हणतात), म्हणून कामदेव असणाऱ्या मदनाच्या पंचबाणात (म्हणजे पाच फुलांत) आम्रमंजिरीला स्थान मिळाले आहे. गुप्त काळामध्ये मद्य सुगंधित करण्यासाठी आम्रमंजिरीचा उपयोग केला जात असे. आंब्याची कोवळी पाने व मोहोर कलशात घालून शुभ शकुनासाठी समोर ठेवण्याची प्रथा मध्ययुगात प्रचलित होती. अजूनही मंगल कलशात त्यांची योजना केलेली असते. “निसर्गोत्सव’ पुस्तकात आम्रमोहोराचे बहारदार वर्णन येते. ‘मोहोराचे तुरे किती भरदार, लांब, डौलदार फुलांच्या भाराने लवलेले दिसत. त्यांचे नाजूक तांबूस देठ व पांढरी बारीक-बारीक फुले पहिल्याने हिरवट, मागून पांढरी, पिवळी व काळसर होऊन गळणारी.
तांबड्या दांड्यांच्या कैऱ्यांचे बारीक-बारीक मणी चिकटलेले किती मजेदार दिसत आहेत! मोहराबरोबरच काही ठिकाणी नवी तांबूस-अंजिरी पालवी वाऱ्याबरोबर डुलत आहे. घरात बसून आमरसाचे भुरके मारण्याइतकेच नखशिखान्त मोहोरलेला आंबा पाहणे तेवढेच सुखावह असते, याचे भान किती जणांना असते? आंब्यावर आणि आमरसावर प्रेम करण्यासाठी किंवा करू इच्छिणाऱ्यांसाठी गो. वि. करंदीकर नावाच्या गुरुजींनी एक चिमुकली मार्गदर्शिका (गाईड) लिहिली आहे. पॉप्युलर नावाच्या दुकानात ती मिळते. आमरस सेवन करणाऱ्यांना त्यांच्याही पुढे जाऊन माझा एक रानटी पण वैज्ञानिक सल्ला आहे. पोळीचा तुकडा रसात बुडवून तो बिलकुल आवाज होऊ न देता खाणे अवैज्ञानिक आहे. हातावा खोल्या करून फुर्रफुर्र आवाज करतच तो खाल्ला पाहिजे. माझे आजोबा सगळ्यांच्या वाट्यांमध्ये किंवा द्रोणांत रस वाढून झाला की म्हणायचे, पोरं हो, आता लावा घोडे पव्हणीला!’ की आम्ही मोठ्याने फुर्रफुर्र आवाज करत तो संपवायचो. शास्त्र हे आहे की, आपल्या जिभेच्या मध्यभागी काही ग्रंथी असतात, केवळ या पद्धतीने रस खाल्ला तरच त्या स्रवतात!
भारतीय संस्कृतीची तोंडओळख करून देताना एका लेखकाने कोकिळा व्रताविषयी फार छान लिहिले आहे. दर अठरा वर्षांनी हे कोकिळाव्रत येते. त्या वर्षी आंब्याची रोपे घरोघरी आणून कुंडीत लावतात. घरातील गृहिणींच्या संख्येत त्या रोपांची संख्या असते. प्रत्येक गृहिणी त्या रोपाची महिनाभर पूजा करते व त्यानंतर ते रोप घराभोवती किंवा शेतात लावण्यात येते. महिनाभराच्या सान्निध्यामुळे प्रत्येक गृहिणीत त्या रोपाविषयी एक प्रकारची आपुलकी, जिव्हाळा निर्माण झालेला असतो. त्यामुळे त्या रोपांचे काळजीपूर्वक जतन केले जाते. आंब्याच्या रोपाचे अठरा वर्षांनी वृक्षात रूपांतर होऊन फलधारणा होते आणि त्या पुढच्या पिढीस त्याची फळे चाखावयास मिळतात.
आपण मदनाला कामदेव केले आणि त्याचे शर म्हणजे बाण हे फुलांना केले. मदनाचे पाच बाण आहेत- पंचशर. अरविंद (लाल कमळ), अशोक, आम्रमंजिरी, जाईचे फूल किंवा मोगरा आणि नीलकमळ. ह्या पाचही फुलांना मार्च महिन्यात बहर येतो. म्हणून वसंतात्मा’ असा गौरव जर कोणाचा करावयाचा असेल, तर तो मार्च महिन्याचाच करावा लागेल. या मदनपारध्याने समाधीत मग्न असणाऱ्या शंकरालाही कामातूर केले, तिथे तुमची-आमची काय कथा! फुलं माणसांतला मदन जागवतात. वसंत ऋतूत याचा कहर होतो.
अशोकाचे दोन प्रकार आहेत. त्यातला खोटा किंवा हिरवा अशोक हा उंचच्या उंच वाढणारा ‘मास्ट ट्री’ आपल्याला बहुधा माहीत असतो. त्याला वसंतात फुलं येत नाहीत. वसंतात फुलणारा अशोक हा सीता-अशोक. आधी लाल रंगाचे त्याचे फुलोरे (पुष्पबंध) पानांच्या बगलेत येतात; नंतर त्यावर प्रथम पिवळसर, नंतर नारंगी व शेवटी लाल दिसणारी फुले येतात. ती मदनाच्या ‘पंचशरां’पैकी एक! अशोकाची पाने लांब, अणकुचीदार, शोभिवंत, कुरळी व नाजूक असतात. म्हणून सुंदरीच्या बोटांना त्याची उपमा देतात. प्राचीन वाङ्मयातील दोहद संकेतानुसार सुंदरीने लत्थाप्रहार केल्याशिवाय अशोकाला फुलेच येत नाहीत. बहरलेला, फुललेला हा वृक्ष पाहणे हा एक नवलनयनोत्सवच असतो. बा. भ. बोरकर प्रेयसीला सुचवितात- आकळू ऋतू गात्रांनी. आपण सदासर्वकाळ हा प्रयोग करत राहिलं पाहिजे.
कडुनिंबाच्या झाडावर वसंत ऋतू सगळ्या संवेदनांच्या दारांतून आकळून घेऊ या. मार्चमध्ये त्याला आलेली नवपल्लवी डोळे भरून पाहा. ती नव्याने डोळ्यांत उतरते, तेव्हा फारच सुंदर दिसते. तांब्याच्या किंवा ब्रॉंझ धातूच्या रंगाची ती आहे. तिच्यावर हळुवार हात फिरवून पाहा. काही दिवसांत ती हिरवी होणार आहे. पानं लांबट, टोकदार, वाकड्या वळलेल्या करवती कडांची आहेत. गुढी पाडव्याच्या सुमारास पानांच्या बेचक्यात अतिशय बारीक, पिवळसर पांढऱ्या फुलांचे तुरे येतात. एखाद्या सुवर्णकाराने नाजूक कर्णफुले घडवावीत अशी ती असतात. कवी गुलजार यांचं अत्यंत आवडतं असं शैलेंद्रांनी लिहिलेलं गाणं आता ऐका-
मिला है किसी का झुमका
ठंडे ठंडे हरे हरे नीम तले…
प्रत्यक्ष चित्रपटात हे गाणं म्हणणारी साधना हातात जास्वंदीचं फूल घेऊन म्हणते ते सोडा. पाडव्याला उभारलेल्या गुढीला सजवण्यासाठी लिंबाची पुष्पवंत डहाळी वापरतात. त्यामुळे गुढी अतिशय देखणी अन् शोभिवंत दिसते. गुढी उभारून झाली, पाडव्याचे पुरणावरणाचे किंवा श्रीखंडाचे जेवण. तत्पूर्वी हिंग, चिंच, गूळ आणि कडुनिंबाच्या फुलोऱ्याचे तयार केलेले पंचामृत चाखून पाहा. पुढचं वर्षभर आजार होणार नाहीत. जूनमध्ये लिंबोळ्या पिकतील तेव्हा त्या आंब्यासारख्या माचून आणि नंतर चाखून पाहा. तारुण्यात कितीही रागीट आणि कडू असलेला माणूस- म्हातारपणी ‘गोड’ होतो, कसा… बहिणाबाई म्हणतात-
कडू निंबोणी शेवटी
पिकीसनी गोड झाली
– विश्वावसू काशिकर