स्मार्टफोनमुळे नैसर्गिक स्मार्टनेस कमी होत असल्याची भीती
लंडन : गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल क्रांतीमुळे स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जगातील सर्वच देशांमध्ये मोबाईलमध्ये नवनवीन प्रयोग करण्यात येत असल्यामुळे स्मार्टफोनची विक्री दरवर्षी वाढतच चालली आहे. पण आता एका नव्या माहितीप्रमाणे, नवी पिढी आता या स्मार्टफोनला कंटाळली असून पुन्हा एकदा अनेक जण डंबफोनकडे वळले आहेत.
स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे आपला नैसर्गिक स्मार्टनेस कमी होत असल्याची भावना निर्माण होऊ लागल्याने अनेक जण पुन्हा एकदा जुन्या काळातील कीपॅड फोनकडे म्हणजेच डंबफोन कडे वळले आहेत. भारतासारख्या मोठ्या देशाचा विचार करता भारतात आज घडीला 120 कोटी मोबाईल युजर्स आहेत. नवीन आकडेवारी बघता भारतातील 35 कोटी युजर डंबफोनचाच वापर करत आहेत.
अमेरिका आणि इतर पाश्चात देशांमध्ये दर 10 पैकी एकजण स्मार्टफोन ऐवजी डंबफोनचा वापर करू लागला आहे. आधुनिक जगात सर्वत्र स्मार्टफोन अस्तित्वात येण्यापूर्वी जे फोन वापरण्यात येत होते, त्या फोनचाच उल्लेख आता डंबफोन असा करण्यात येतो म्हणजेच त्या छोट्याशा फोनवर फक्त एक कीपॅड असायचे फोन लावण्यासाठी किंवा एखादा आलेला फोन घेण्यासाठीच या उपकरणाचा वापर केला. जायचा याशिवाय मेसेज पाठवणे किंवा मेसेज स्वीकारणे हे अजून एक काम हा फोन करायचा इतर कोणतेही काम या डंब फोनला शक्य नव्हते पण स्मार्टफोन मात्र सर्वच कामे करू लागला आहे.
स्मार्टफोनवर शेकडो ॲप्स उपलब्ध असतात इंटरनेटचा चांगल्या प्रकारे वापर करता येतो. फोटो काढण्यापासून एडिट करण्यापर्यंत सर्व प्रक्रिया स्मार्टफोनच्या माध्यमातून शक्य असतात काही व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यात समोर येणाऱ्या सगळं गरजांची पूर्तता स्मार्टफोन करत असल्यामुळेच आता नवी पिढी काही प्रमाणात या स्मार्टफोनच्या स्मार्टनेसला कंटाळली आहे. नैसर्गिक स्मार्टनेस या स्मार्टफोनने कमी झाला असल्याची भावना वाढीस लागली असून अनेक तरुण पुन्हा एकदा या डंबफोन कडे वळले आहेत.
संपर्क करणे आणि संवाद साधणे हेच फोनचे काम असल्यामुळे हे काम करणारेच फोन आपण वापरावेत अशा प्रकारची भावना आता तरुण पिढीमध्ये सुद्धा तयार होऊ लागली आहे. गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये स्मार्टफोनचा वापर वाढल्यानंतर डंबफोनचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर कमी झाले होते, पण 2020 नंतर जगातील सर्वच कंपन्यांनी या फोनच्या उत्पादनाची प्रक्रियाही वाढवली आहे. या ना त्या कारणाने 24 तास बिझी ठेवणाऱ्या आणि सतत हातात असणाऱ्या स्मार्टफोनपेक्षा फक्त संवाद साधण्यासाठी उपयुक्त ठरणारा डंब फोनच आता तरुण पिढीला आकर्षित करू लागला आहे.