पुणे -उरुळी देवाची येथील कचरा डेपोवर उभारण्यात आलेल्या सौर उर्जा प्रकल्पातून दिवसाला 400 युनिट वीज निर्मिती सुरू झाली आहे. असा प्रकल्प राबविणारी पुणे ही पहिलीच महापालिका ठरली आहे.
या ठिकाणी 100 किलोवॅट क्षमतेचा हा प्रकल्प उभारलेला आहे. येथे निर्माण होणारी वीज प्रक्रिया प्रकल्पासह डेपोच्या आवारातील पथदिवे आणि इतर कामांसाठी वापरण्यात येणार असून या प्रकल्पासाठी महापालिकेस 56 लाख रुपयांचा खर्च आला आहे.
उरुळी देवाची कचरा प्रक्रिया प्रकल्पात कचरा टाकण्यास बंदी असली, तरी त्या ठिकाणी महापालिकेचा प्रक्रिया प्रकल्प सुरू आहे. याशिवाय आधीच्या कचऱ्यावर बायोमायनिंग करण्यात येत आहे. ज्या भागातील कचरा प्रक्रिया झालेला आहे, तेथील कचरा काढण्यात आल्यानंतर त्यावर महापालिकेने वन उद्यान साकारले असून, जवळपास 20 हजार झाडेही लावलेली आहेत. त्यानंतर आता या ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी उभारण्यात आलेल्या शेडवर महापालिका सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प प्रस्तावित केला होता. शहरात महापालिकेकडून घनकचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने केले जात नसल्याने राष्ट्रीय हरीत लवादाने (एनजीटी) पालिकेस दंड आकारलेला होता. या दंडाच्या रकमेतून महापालिकेने सौर ऊर्जा प्रकल्प उभारावा, असे सूचविले होते.
त्यानुसार महापालिकेने तातडीने पावले उचलत या प्रकल्पासाठी निविदा काढली होती. त्यामुळे प्रकल्पाच्या ठिकाणी विजेचा वापर कमी होऊन सौर ऊर्जेचा वापर वाढणार असल्याने कार्बन उर्त्सजन कमी होण्यासही मदत होणार आहे.
उन्हाळ्यात वीज निर्मिती वाढणार
या प्रकल्पाच्या ठिकाणी दिवसाला 400 युनिटची निर्मिती सुरू झाली असून उन्हाळा वाढल्यानंतर यातून होणारी वीज निर्मितीही वाढणार आहे. तूर्तास या ठिकाणी असलेल्या भूमीग्रीन एनर्जी कचरा प्रकल्पासाठी दिवसाला सात ते साडेसात हजार युनीट विजेची गरज आहे. मात्र, सौर उर्जेपासून निर्माण होणारी वीज कमी असल्याने या प्रकल्पाच्या ठिकाणी इतर आवश्यक असलेल्या कामांसाठी त्याचा वापर करण्याचे नियोजन सुरू असल्याचे महापालिकेच्या विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनीवास कंदूल यांनी सांगितले.