फलटण -मी पालकमंत्री नसताना जिल्ह्याचा विकासाचा निधी फलटण आणि कराडला वळविला जात असल्याचे समजत होतो. मात्र फलटणलापण निधीचा अनुशेष असल्याचे दिसत आहे हे पाहता जिल्ह्यासाठी मिळणारा निधी कोठे गेला ? असा सवाल जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी करताना अप्रत्यक्षरित्या राष्टवादी कॉंग्रेसच्या नेतेमंडळीना जबाबदार धरतानाच यापुढे सर्वांना समान निधी वाटप केले जाईल. जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढू, अशी ग्वाही दिली.
फलटण येथील डेक्कन चौकामध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेच्यावतीने शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबीर व फलटण तालुका बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटनपालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी ना. शंभूराज देसाई यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजनही करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख शरद कणसे, सातारा जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, जेष्ठ नेते प्रल्हादराव सांळुखे-पाटील, समशेरसिंह नाईक निंबाळकर, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ऍड. नरसिंह निकम, अशोकराव जाधव, महिला आघाडी प्रमुख शारदाताई जाधव, विश्वासराव भोसले, विराज खराडे, विजय मायणे, सचिन बिडवे उपस्थित होते. फलटण तालुक्याला गेल्या अडीच वर्षात निधी वाटपात अनुशेष राहिला आहे. आता पालकमंत्री आपण झाला आहात.
आता हा अनुशेष भरुन काढा, अशी अपेक्षा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केल्यावर, आतापर्यंत जिल्ह्यातला सर्वाधिक निधी कराड आणि फलटणला गेला म्हणून आम्ही टाहो फोडत होतो. फलटणला पण हा निधी आला नाही म्हणजे गेला कुठे? असा सवाल शंभूराज देसाई यांनी करतानाचयापुढे सर्वांना समान निधी वाटप केले जाईल. जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढू, अशी ग्वाही दिली. झिरपवाडी येथील बंद असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न लवकरच खा. रणजितसिंह निंबाळकर यांना सोबत घेत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सोडवू निधीची कमतरता पडू देणार नाही, असे सांगतानाच बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांना भरभक्कम ताकत दिली जाईल.
त्यांनी सुचविलेली विकास कामे केली जाईल, अशी ग्वाही शंभूराज देसाई यांनी दिली. बाळासाहेबाची शिवसेना आणि भाजप यापुढे तालुक्यात सर्व निवडणुका एकत्रित लढणार असून फलटण तालुक्यातील झिरपवाडी रुग्णालयाचा प्रलंबित प्रश्न तातडीने पालकमंत्र्यांनी त्यांच्या अधिकारात सोडवावा विकासाचा अनुशेष भरून काढावा अशी मागणी करतानाच नीरा देवघरच्या कालव्याच्या प्रश्न अंतिम टप्प्यात आला असून लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पुढील कामांचा शुभारंभ होणार आहे तालुक्याचे विकासात आमचे सरकार कमी पडणार नाही असे खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक विराज खराडे प्रास्ताविक केले. विजय मायने यांनी आभार मानले.