मंचर /पारगाव – पारगाव(ता. आंबेगाव) येथील पोलीस स्टेशन आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या संयुक्त विद्यमाने रात्रीच्या वेळी ऊस वाहतूक करणाऱ्या गाड्या, ट्रॅक्टर, ट्रक, बैलगाडी इत्यादी वाहनांना रिफ्लेक्टर आणि रेडियम पट्ट्या बसवल्याने रात्रीच्या वेळी होणारे वाहनांचे अपघात कमी होण्यास मदत होणार असल्याचे भीमाशंकर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी सांगितले.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातून रात्रीच्या वेळी भाजीपाला वाहतुकीचे टेम्पो, दुधाचे टॅंकर, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उसाने भरलेले ट्रक, साखरेचे ट्रक, ट्रॅक्टर, ऊस वाहतूक करणाऱ्या टायर गाड्या, बैलगाड्या यांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू होत असते. रात्रीच्या वेळी अशा वाहनांना रिफ्लेक्टर किंवा रेडियम पट्ट्या नसल्याने वारंवार अपघात होत असतात.
पारगाव पोलीस स्टेशन व भीमाशंकर सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेकट्र लावण्यात आले आणि रिफ्लेक्टर वापरणे, वाहतुकीचे नियम पाळणे, नियम न पाळण्यामुळे होणारे अपघात इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे आणि पारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लहू थाटे, कर्मचारी, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, कारखान्याचे कार्यालयीन अध्यक्ष रामनाथ हिंगे पोलीस कर्मचारी गणेश जोरी नवनाथ राक्षे, राजेश उतळे, कारखान्याचे सिक्युरिटी ऑफिसर गाढवे, ऊस वाहतूकदार उपस्थित होते.
ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचाकांनी वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे. यापुढील काळात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांनी नियमाचे पालन केले नाही, तर त्यांच्यावर कडक पोलीस कारवाई करण्यात येणार आहे.
– लहू थाटे, पोलीस निरीक्षक