शिर्डी -महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेतला तर शिर्डी आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या बाबत विकासाची स्वप्ने कार्गो विमानसेवेतून नक्कीच साकार होऊ शकते. भविष्यात एमआयडीसीसाठी याच परिसरात जागा उपलब्ध झाल्यास शिर्डी हे राज्यातील हायटेक शहर म्हणून नावारूपाला येण्यास मदत होईल, अशी अपेक्षा साईनिर्माण उद्योग समूहाचे संस्थापक विजय कोते यांनी व्यक्त केली.
वास्तविक, साईबाबांच्या आशीर्वादाने शिर्डी तीर्थक्षेत्र हे आंतरराष्ट्रीय झाले असले तरी या शहराचा विकास मात्र जसा व्हायला हवा होता तसा झालेला नाही. बसस्थानक, रेल्वेस्टेशन, हॉस्पिटल, शैक्षणिक संकुल, आशिया खंडातील सर्वात मोठे मेगा किचन अर्थात साई प्रसादालय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ ही सर्व विकासकामे दहा वर्षांपूर्वीच्या विश्वस्तांच्या धोरणात्मक निर्णयाचे प्रतीक आहे. मात्र, त्यानंतर या दहा वर्षांत केवळ अस्थिरतेमुळे शिर्डीतील विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे. भारतातील अनेक उद्योगपतींची नजर शिर्डीकडे वळाली असून त्याच मुख्य कारण म्हणजे काकडी येथील शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आहे.
याठिकाणी काही दिवसांतच नाईट लॅंडिंग सुविधेसह कार्गो विमानसेवा सुरू होणार आहे. एअरपोर्टची सध्या साडे सातशेहून अधिक एकर जागा असून विमान पार्किंगसाठी मोठी जागा उपलब्ध आहे. अशातच पुणे, मुंबई, औरंगाबाद तसेच इतर जिल्ह्यातील अनेक छोट्या मोठ्या कंपन्यांचे प्रॉडक्ट, शेतकऱ्यांचे द्राक्ष, पेरू, डाळिंब, इतर भाजीपाला याची वाहतूक करण्यासाठी शिर्डी आंतरराष्ट्रीय एअरपोर्टची कार्गो विमानसेवा हे राज्याचं भविष्यात केंद्र होऊ शकते.
त्यामुळेच सध्या काकडी शिवारात अनेक उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात गोडाउनसाठी जागा विकत घेण्यासाठी शोधाशोध सुरू केली आहे. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना सुगीचे दिवस तर येतीलच पण यामाध्यमातून अनेक तरुण-तरुणींना मोठ्या रोजगाराची आणि नोकरीची संधी यामाध्यमातून निर्माण होणार आहे.
साई संस्थानने पुढाकार घेऊन आयटी पार्क, मेडिकल कॉलेज, पर्यटनासाठी मनोरंजक बगीचा, लेजर शो यासारखे रखडलेले प्रोजेक्ट लवकर विकसित केले तर साईंची शिर्डी एक आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्राबरोबर एअरपोर्टच्या माध्यमातून एक ट्रान्सपोर्ट बिझनेस हब सेंटर म्हणून लवकरच नावारूपाला येऊ शकते. यासाठी एक पाऊल पुढे म्हणून साई संस्थान प्रशासनाने अभ्यासपूर्वक विचार करून यावर निर्णय घेतले तर बेरोजगारी संपुष्टात येऊन शिर्डी शहर हे हायटेक सिटी होण्यास नक्कीच मदतगार म्हणून उदयास येऊ शकते.
राज्य सरकारची उदासीनता
शिर्डी तथा पंचक्रोशीतील विकासाची कामधेनू म्हणून साई संस्थांनकडे बघितले जाते, मात्र कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी शिर्डीतील साई संस्थांनच्या बाबत धोरणात्मक निर्णय घेण्यास राज्य सरकार कायमच उदासीन असल्याचा अनुभव ग्रामस्थांना आला असून त्यामुळे प्रचंड नाराजी पसरली आहे.