- धरणातून 7800 विसर्ग होणार
पिंपरी, दि. 16 – पवना धरण परिसरात जोरदार पाऊस कोसळत असून धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने मोठी वाढ होत आहे. धरण शंभर टक्के भरले असून धरणातून पाण्याचा विसर्गही सातत्याने वाढविण्यात येत आहे. आज (शुक्रवार) सकाळी आठ वाजता पाण्याचा 5600 क्युसेक विसर्ग करण्यात येत होता. मात्र, सातत्याने पाऊस वाढत असल्यामुळे दुपारी एकपासून 6400 क्युसेस व पावर आऊटलेट 1400 असे एकूण 7800 क्युसेक वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे पवना नदी काठच्या गावातील नागरिकांना सर्तक राहण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. जुलै महिन्याच्या मध्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे यंदाही धरण ऑगस्ट महिन्यातच धरण शंभर टक्के भरले आहे. त्यानंतरही धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा येवा वाढला आहे. अनेकवेळा पाण्याचा विसर्ग करावा लागला. मागील काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून पवना धरण परिसरात पावसाने हजेरी लावली. धरणात सध्या 100 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आज सकाळी आठ वाजल्यापासून धरणाच्या वीज र्निमिती संचाद्वारे 1400 तर सांडव्यातून 2100 असे 3 हजार 500 क्युसेकने पाणी नदीत सोडण्यात येत होते. धरण परिसरात पावसाचा जोर कायम असून धरण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढले आहे. दुपारी एकपासून 4200 क्युसेक वाढवुन 6400 क्युसेस व पावर आऊटलेटसाठी 1400 असे एकूण 7800 क्युसेक वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे पवना नदी किनाऱ्यावरील गावातील नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. तसेच पावसाचा जोर पाहून पाण्याचा विसर्ग कमी-जास्त करण्यात येणार असल्याचेही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.