मुंबई – बॉलीवूडचे लोकप्रिय जोडपे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मंगळवारी संध्याकाळी महाकाल मंदिराच्या दर्शनासाठी उज्जैनला पोहोचले. मात्र या जोडप्याला दर्शन न घेताच परतावे लागले.
केवळ चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी बाबा महाकालच्या दर्शनासाठी गर्भगृहात जाऊ शकले. खरं तर, आलिया-रणबीर आणि अयान मुखर्जीच्या येण्यापूर्वीच बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी महाकाल मंदिराच्या मुख्य आणि व्हीव्हीआयपी शंख गेटवर गोंधळ घातला, त्यानंतर रणबीर-आलिया आणि अयान मुखर्जी यांना उज्जैनचे जिल्हाधिकारी आशिष यांनी मंदिरातून बाहेर काढले तसेच सुरक्षित घरी पोहचवले.
रणबीर आणि आलियाला काळे झेंडे दाखवण्याच्या उद्देशाने हिंदू संघटनेचे कार्यकर्ते पोहोचले होते. मात्र, पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून त्यांचा पाठलाग केला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, रणबीर कपूरने स्वत: बीफ खातो असे सांगितले आहे. अशा परिस्थितीत गोमांस खाणाऱ्यांना मंदिरात प्रवेश कसा दिला जातो, याचे उत्तर प्रशासनाला द्यावे लागेल.
दरम्यान, हे स्टार कपल इंदोर विमानतळावरून संध्याकाळी साडेसहा वाजता उज्जैनमधील बाबा महाकालच्या दर्शनासाठी निघाले होते. दोघेही त्यांच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या यशासाठी आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीही त्याच्यासोबत होता. या जोडप्याने उज्जैनला पोहोचण्यापूर्वी एक व्हिडिओ जारी करून त्यांच्या आगमनाची माहितीही दिली होती. आलिया आणि रणबीरने याच वर्षी १४ एप्रिलला लग्न केले. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच आई-वडील होणार आहेत.