भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मुंबई दौऱ्यावर आगमन झाले. महाराष्ट्रात भाजपची पुन्हा सत्ता आल्यानंतरची त्यांची ही पहिलीच मुंबई भेट होती. या पहिल्या भेटीतच त्यांनी शिवसेनेवर जोरदार प्रहार करीत जी आक्रमकता दाखवली आहे, ती अवाक करणारी ठरली आहे. उद्धव ठाकरे यांना जमीन दाखवा, त्यांनी आपल्याला धोका दिला आहे, राजकारणात बाकी काहीही करा पण धोका सहन करू नका, जे दगा देतात त्यांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे, मुंबईवर केवळ भाजपचेच वर्चस्व राहिले पाहिजे, अशी विधाने अमित शहा यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना केली आहेत.
सामान्य कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी अशी विधाने केली असती, तर ती एकवेळ समजून घेता आली असती. कारण कार्यकर्त्यांना चेतवण्यासाठी काही वेळा अशा आक्रमक विधानांचा आधार घ्यावा लागतो; परंतु पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी अशी भाषा वापरणे मात्र अनावश्यक ठरले आहे. अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांच्या तोंडून राजकीय अपरिहार्यतेपोटीही अशी अनावश्यक आक्रमकता व्यक्त होणे अनाठायीच ठरले आहे. त्यांच्या या वक्तव्यांचे नीट राजकीय आकलन केले तर अमित शहा यांनी मुंबईत येऊन शिवसेनेला अशा स्वरूपाची इशारे देणारी भाषा वापरणे हे भाजपचेच गणित बिघडवणारी ठरू शकते याचाही विचार त्यांनी करायला हवा. खरे तर सध्याच्या पूर्ण अनुकूल वातावरणात त्यांना अशा आक्रमकतेची आज गरजच नव्हती.
राज्यातील सरकार त्यांच्या ताब्यात आले आहे, शिवसेना फुटली आहे त्यामुळे भाजपची एकुणातच स्थिती चांगली असताना त्यांनी शिवसेनेतलाच अंगार फुलवण्याचे काम यानिमित्ताने केले आहे, असे म्हणावे लागेल. मुंबई महापालिकेच्या तोंडावर अमित शहा यांचा हा दौरा होता. या निवडणुकीत त्यांनी मिशन 150 चे उद्दिष्ट पक्षाला दिले आहे. यंदा काहीही करून मुंबई महापालिका ताब्यात घ्यायची आणि उरलीसुरली शिवसेना संपवायची असा त्यांचा एकूण रोख दिसतो आहे. असे धोरण ठेवण्यात कोणाचाही आक्षेप नाही, राजकीय पक्षाने असा निर्धार व्यक्त करायचाच असतो. पण मुंबईसारख्या महाराष्ट्राच्या राजधानीत येऊन हा राजकीय निर्धार व्यक्त करण्याची भाषा जरा सौम्य असायला हवी होती. कोणाला तरी कायमचे संपवण्यासाठी त्यांना जमीन दाखवा वगैरे विधाने अचंबित करणारी आहेत. केवळ दोन जागांसाठी शिवसेनेने आपल्याला दगा दिला, आपला विश्वासघात केला असा तपशील त्यांनी दिला आहे.
वास्तविक अमित शहा यांनीच बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत आपल्याला जे आश्वासन दिले होते त्याचा त्यांना विसर पडल्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी मांडली आहे. राज्यातील सत्तेचे वाटप फिफ्टी-फिफ्टी स्वरूपात करण्याचे अमित शहा यांनी मान्य केले होते आणि त्यानुसार मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षांसाठी शिवसेना आणि भाजपने वाटून घ्यायचे ठरले असताना भाजपने घुमजाव केल्याचा आरोप करीत शिवसेनेने भाजपशी असलेले संबंध तोडून महाविकास आघाडीचा प्रयोग केला होता. हा सारा तपशील फार जुना नाही. अमित शहांनीच शब्द फिरवला असा उद्धव ठाकरेंचा आरोप असताना आज शिवसेनेने आपला विश्वासघात केला असे अमित शहा यांनी म्हटले आहे. खरे तर हा सारा घटनाक्रम आता मागे पडला आहे. राज्यातील राजकारण बरेच पुढे गेले आहे. तरीही पुन्हा जुन्या विषयाला तोंड फोडण्याचे कामही शहा यांच्या विधानांतून झाले आहे. त्यामुळे हा विषय आता पुन्हा चर्चेला येणे अपरिहार्य आहे.
शिवसेना आज बऱ्यापैकी गलितगात्र झाली आहे. त्यांची ताकद अनेक पातळ्यांवर विभागली गेली आहे त्यातून ते उभारी घेण्याचा कसोशीचा प्रयत्न करीत आहेत. पण आज अमित शहा यांनी शिवसेनेचे हे काम सोपे केले आहे असाच एकूण रागरंग दिसतो आहे. एक तर गुजराती नेत्यांची मानसिकता महाराष्ट्र विरोधी आहे, असे मुंबईतील व राज्यातील वातावरण मोरारजी देसाईंच्या काळापासून आहे. मुंबईतल्या अनेक संस्था आणि उद्योग गुजरातला पळवून नेण्यात आल्याचाही आरोप सातत्याने होतो आहे. या पार्श्वभूमीवर गुजरातची पार्श्वभूमी असलेल्या अमित शहा यांनी पुन्हा याच कटुतेच्या वातावरणाला वाव मिळेल अशी भूमिका टाळणे अपेक्षित आहे. आज मुंबईत येऊन शिवसेनेला अमित शहांनी जी ललकारी दिली आहे त्याचा तेथील जनमानसावरही वेगळाच परिणाम झाला असणार. त्याचे पडसाद भाजपला प्रत्यक्ष महापालिका निवडणुकीत भोगायला लागू शकतात.
मुंबई महापालिकेवर शिवसेनेची गेली 25 वर्षे सत्ता आहे. त्यामुळे शिवसेनेच्या विरोधात नैसर्गिक पद्धतीनेच अँटी इन्कबन्सी तेथे तयार झाली आहे आणि तशातच शिवसेनेत मोठी फूट पडली असल्याने ही निवडणूक भाजपला फारशी अवघड नव्हती. परंतु अमित शहा यांच्यासारख्या धुरंदर आणि चाणक्य स्वरूपाच्या नेत्यानेच भाजपसाठी ही निवडणूक आता अवघड करून ठेवली आहे. अमित शहा यांनी एक प्रकारे शिवसेनेला मातीतून पुन्हा भरारी घेण्यासाठी उद्युक्त केले आहे. शिवसेना फुटली असली तरी मुंबईतील मूळचा शिवसैनिक आहे तेथेच आहे. तो आता अधिक चवताळून शिवसेनेच्या यशासाठी झटणार हे सांगायला राजकीय भाष्यकारांची गरज नाही. अमित शहा यांनी आपल्या या दौऱ्यात सिद्धी विनायकाचे दर्शन घेतले. त्यातही सध्याचे दिवस गणपतींचे आहेत.
मुंबईत बाप्पांच्या उत्सवात मंगलमय वातावरण असते. त्यामुळे अमित शहांनी राज्यात आलेल्या नव्या सरकारला पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करून महाराष्ट्राच्या विकासात आणखी काय योगदान देता येणे शक्य आहे किंवा केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला आणखी काय मदत दिली जाईल यावर भाष्य करणे अपेक्षित होते. थोडक्यात सांगायचे, तर राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या भाजप सरकारकडून राज्याला आणि मुंबईला दिलासा देण्याची भूमिका अमित शहा यांनी घेणे अपेक्षित असताना, कोणाला तरी जमीन दाखवण्याची भाषा करणे हे काही अंशी अपरिपक्वपणाचे ठरले आहे. अमित शहा यांच्या रोखठोक शैलीतील इशारेबाजीला शिवसेना आता कसा प्रतिसाद देणार ते पहावे लागेल.