दुबई – जगातील सर्वोत्तम संघ भारत व मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणारा सर्वात यशस्वी संघ श्रीलंका यांच्यात आज (मंगळवार) आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेतील महत्त्वाची लढत होत आहे. साखळी फेरीत अपयशी कामगिरी केल्यानंतरही फिनिस्कप्रामणे भरारी घेतलेल्या श्रीलंका संघाचे मोठे आव्हान भारतीय संघासमोर राहणार आहे.
भारताचा टी-20 संघ बलाढ्य दिसत असला तरीही सलामीची जोडी तसेच मधली पळी सातत्याने सरस कामगिरी करताना दिसलेली नाही. कर्णधार रोहित शर्मा तर सातत्याने अपयशी ठरत आहे. लोकेश राहुलचेही संघातील स्थान निश्चित नाही. अशा स्थितीत नुकताच अर्धशतकी खेळी करुन भरात आला असे वाटत असलेला विराट कोहली, सूर्यकुमार यादव व हार्दिक पंड्या या तिनच खेळाडूंच्या कामगिरीवर संघाचे यशापयश अवलंबून राहणार आहे. त्यातच पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत डावाला आकार देण्याची क्षमता असलेला रवींद्र जडेजा दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक किंवा ऋषभ पंत तसेच अक्सर पटेल यांनाही चमक दाखवावी लागणार आहे.
Mark your calendars…🗓️#RoaringForGlory #AsiaCup2022 pic.twitter.com/wjtiKYawgX
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 5, 2022
पहिल्यांदा फलंदाजी आली तर किमान 180 धावा कराव्या लागतील. तर पहिली गोलंदाजी असेल तर श्रीलंकेला किमान 155-160 धावांच्या आत रोखावे लागेल. या स्पर्धेत भारतीय संघाला दमदार सलामी मिळालेली नाही. पहिल्या पाच फलंदाजांनी बेजबाबदार फटकेबाजी न करता संयमी व कमीत कमी धोका पत्करून खेळी करणे गरजेचे आहे.
रोहित कधी जबाबदारी घेणार
भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख फलंदाज विराट कोहली सातत्याने अपयशी ठरत अहे अशी टीका सातत्याने केली जात आहे. मात्र, त्याच्यापेक्षाही सुमार कामगिरी रोहित शर्मा करत आहे पण त्याबाबत अद्याप कोणी टीका केली नाही. पण संघाचे कर्णधारपद बूषवत असतानाही रोहितची कामगिरी खालावलेलीच असेल तर अन्य खेळाडूंकडून काय अपेक्षा करणार त्यामुळे आता तरी रोहित जबादारीने खेळणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दुसरीकडे श्रीलंका संघ अपयशाच्या गर्तेतून बाहेर आला असून त्यांनी साखळी फेरीतील सलामीच्या लढतीत अफगाणिस्तानकडून पराभव स्वीकारला होता. मात्र, या पराभवानंतर त्यांचा खेळ उंचावला व त्यांनी जिद्दीने बांगलादेशला पराभूत करत सुपर फोर गटात स्थान मिळवले. तसेच साखळीतील पराभवाचा वचपा काढताना त्यांनी अफगाणिस्तानचाही पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळेल याची दावेदारी सिद्ध केली.
श्रीलंका संघाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उदय झाल्यापासून मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणारा संघ अशीच त्यांची ओळख बनली आहे. त्यामुळे त्यांच्या पहिल्या पाच फलंदाजांना बाद करण्यासाठी भारतीय गोलंदाजांना योजना तयार करून त्यानुसार खेळ करावा लागेल.