वेल्हे तालुक्यात अतिवृष्टीचा फटका ः प्रशासनाकडून पंचनामे पूर्ण
वेल्हे – वेल्ह्याच्या विविध भागांमध्ये मागील पंधरा दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे , शेतकऱ्यांचे शेतीबरोबरच अन्यही नुकसान झाले आहे. रस्ते आणि महावितरणचे यात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. शासन नियमानुसार लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
वेल्हे तालुक्यामध्ये मागील पंधरा दिवसांपासून मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. या नुकसानीत 100 पेक्षा जास्त जनावरांचा गारठ्याने मृत्यू झाला आहे, तर शेतबांध, घरांची पडझड, पिकांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्यामुळे निम्मा तालुका 15 ते 20 दिवस अंधारात होता. येथील बहुसंख्येने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पुलांची कामे अर्धवट असल्यामुळे व जुन्या पुलांवरून वारंवार पाणी जात असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटतो आहे.
वेल्हे तालुका पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आहे. याचा विचार करून प्रशासनातर्फे योग्य नियोजन होणे अपेक्षित आहे. आकाराने तालुका लहान असला तरी रस्ते-वीज समस्यांबाबत स्थानिकांना सातत्याने सामोरे जावे लागते. विजेचे खांब कोसळले की त्या दिवसापासून पुढे दहा-पंधरा दिवस वीज पुरवठा खंडित होतो. रस्त्यांची कामे पावसाळ्याच्या तोंडावर केल्याने त्यांचा दर्जाही खालावलेला आहे. रस्त्याच्या कडेने गटारे नसल्यामुळे रस्त्यांची पावसामुळे चाळण होते आहे.
भात लावणीच्या तोंडावर आलेल्या या पावसामुळे भात किंवा नाचणी पिकांचे नुकसान जरी कमी झाले असले तरी तीळ, भुईमूग, वाल व अन्य पालेभाज्या, फळबागा यांचे मोठे नुकसान तालुक्यात झाले आहे. उशिरा आलेल्या पावसामुळे लांबलेल्या भातलावणीमुळे भात उत्पन्नातही घट होण्याची शक्यता अधिक आहे. अनेक ठिकाणी लागवड केलेल्या फळबागांचेही नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने नवीन लागवडीसाठी अनुदान द्यावे, अशीही मागणी होत आहे.
पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे वारंवार नुकसान होत आहे. प्रशासनाने रस्ते, वीज, नदी-नाल्यांवरील पूल, पाणीपुरवठा, आरोग्य यांचे योग्य प्रकारे नियोजन केले पाहिजे, ही नागरिकांची अपेक्षा आहे. मात्र याकडे कोणताही राजकीय पक्ष वा लक्ष देताना दिसत नाही.
– नितीन भरम, तालुकाध्यक्ष, राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ, वेल्हे.
वेल्ह्यात विकासकामे करताना कोणीच गांभीर्याने घेत नाही, भविष्यकालीन नियोजन नाही, त्यांच्या दर्जाबाबत तडजोड केली जाते, या गोष्टी थांबल्या पाहिजेत.
– दत्ता मराठे, स्थानिक, मांजई आसनी