प्रभात वृत्तसेवा,पुणे, दि. 29 -पीएमपीएमएलचे उद्दिष्ट हे प्रवाशांसाठी दर्जेदार वाहतूक सेवा देणे आहे. परंतु, पीएमपीच्या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांची कायम गैरसोय होत असते. बससेवा सुरळीत करण्याऐवजी नवीन कॅब सेवेमुळे प्रवाशांना फायदा होण्याऐवजी अशा कॅबमुळे वाहतुकीची कोंडी व प्रदूषण वाढण्याचा तसेच ही सेवा रिक्षाचालकांच्या मुळावर उठणारी आहे, त्यामुळे पीएमपीच्या कॅब सेवेला “आम आदमी पार्टी’चा कायम विरोध असेल, असे आपचे राज्य संघटक व पुणे कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी सांगितले.
पीएमपी बसबरोबर लवकरच पुण्याच्या रस्त्यावर पीएमपी कॅबही धावणार आहेत. पीएमपीएलच्या या नव्या योजनेला प्रवासी संघटनेचा विरोध आहे, बसमधून 50 प्रवासी प्रवास करतात तर कॅबमधून फक्त 5 प्रवासी प्रवास करू शकतात. 50 प्रवाशांना कॅबमधून प्रवास करायचा असेल तर 10 कॅब लागतील. सध्या, पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या फार गंभीर आहे, यामध्ये या नवीन कॅबची भर पडल्यावर वाहतूक कोंडी आणि प्रदूषणातही वाढ होणार आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरात एकूण 65 लाखाहून जास्त वाहने आहेत, त्यात या कॅबची भर पडल्यावर सुविधेपेक्षा वाहतूक कोंडी आणि प्रदूषण या समस्या वाढतील. या कॅबमुळे अगोदरच आर्थिक संकटात सापडलेला रिक्षा चालकांवरही उपासमारीची वेळ येईल, ओला-उबेरला पूर्वीपासून विरोध करणाऱ्या रिक्षा चालकांवर पीएमपीची कॅब ही मोठा अन्याय ठरेल. “आप’ सार्वजनिक वाहतूक समन्वय समितीचे चेंथिल अय्यर म्हणाले की, पीएमपी हा खासगी टॅक्सी व्यवसाय होऊ शकत नाही. विश्वासार्ह, प्रभावी, कार्यक्षम आणि परवडणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करणे हा त्यांचा प्राथमिक उद्देश आहे. मात्र, याचा पीएमपीला विसर पडला आहे.