मुंबई – शिंदे-फडणवीस यांचे सरकार अस्तित्वात नाही. ‘एक दुजे के लिये’ चित्रपटातील ‘वासू-सपना’ या प्रेमवीरांप्रमाणे हे दोघेच फिरतात, मजा मारतात, गाणी गातात, बागडतात. एकंदरीत त्यांच्या जीवनात नव्याने फुलबाग बहरली आहे, पण चित्रपटाच्या पडद्यावरील वासू-सपनाचे प्रेम अस्सल होते. तसे या वासू-सपनाचे आहे काय? असा सवाल शिवसेनेने आपल्या मुखपत्र असलेल्या सामनामधून उपस्थित केला आहे.
त्यांची ‘आशिकी’ सत्तेची आहे. त्यांना खुर्चीचा ‘प्रेमरोग’ जडला आहे. खुर्चीलाच ‘अनारकली’ मानून त्यांच्या प्रेमाचे जप-जाप सुरू आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात ही नवी ‘लव्हस्टोरी-22’ उदयास आली आह़े असे म्हणत शिंदे फडणवीस सरकारवर सामनामधून फिल्मी स्टायलने बाण मारण्यात आले आहेत.
सध्या राज्याच्या मंत्रिमंडळात केवळ उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री असल्यासामुळे मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. सरकारचे सर्व निर्णय सध्या मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनाच जाहीर करावे लागत आहेत. मंत्री किंवा पालकमंत्री होण्यासाठी अनेक अब्दुल्ला दिवाने झाले आहेत. त्यामुळे वासू-सपनाच्या अंगाची हळद उतरण्याआधीच मांडवात जो गोंधळ सुरू झालाय ती गंमत महाराष्ट्रात कधीच घडली नव्हती. अशा मार्मिक शब्दात सामनातून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाष्य करण्यात आले आहे.