शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी भाजपवर हल्लाबोल केला. महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपला केवळ शिवसेनेचे विभाजन करायचे नाही, तर या प्रादेशिक पक्षाचा नाश करायचा आहे, असे राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी नव्याने स्थापन झालेल्या एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारला ‘बेकायदेशीर’ म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.
भाजपला पक्ष उद्ध्वस्त करायचा आहे
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते राऊत म्हणाले की, बंडखोर आमदार पक्ष नेतृत्वाविरुद्ध बंडखोरीची वेगवेगळी कारणे देत आहेत. शिवसेनेच्या आमदारांच्या बंडामुळे गेल्या महिन्याच्या अखेरीस महाविकास आघाडीचे सरकार पडले. राऊत म्हणाले, भाजपला केवळ शिवसेनेत फूट पाडायची नाही, तर पक्षाला उद्ध्वस्त करायचं आहे. जोपर्यंत शिवसेना अस्तित्वात आहे, तोपर्यंत त्यांना महाराष्ट्राच्या तीन तुकड्यांचं स्वप्न पूर्ण करता येणार नाही. महाराष्ट्राला मुक्त करता येणार नाही.
राज्यपाल विश्वासदर्शक ठरावाचा आदेश कसा देऊ शकतात?
३० जून रोजी शपथ घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नवे सरकार बेकायदेशीर असल्याचे शिवसेनेच्या खासदाराने म्हटले आहे. शिवसेनेच्या १६ आमदारांची अपात्रता याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना राज्यपाल विश्वासदर्शक ठरावाचा आदेश कसा काय देऊ शकतात, असा सवाल राऊत यांनी केला. विशेष म्हणजे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ४ जुलै रोजी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला होता.