मुंबई – एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीचे भवितव्य अंधारात आहे. एकीकडे सरकार वाचवायचं की पक्षात पडलेली उभी आडवी फूट रोखायची अशा दुहेरी संकटात शिवसेना सापडली आहे. बंडखोर शिंदे गटाने शिवसेनेने भाजपसोबत सरकार स्थापन करावं अशी तहजेत मागणी केली आहे. शिवसेना नेतृत्व मात्र यासाठी तयार नसल्याचं दिसतंय. राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडत असतानाच गेल्या काही दिवसांपासून वेट अँड वॉच भूमिकेत असलेला भाजप ऍक्टिव्ह झाला आहे. भाजपचे राज्यातील शीर्ष नेते देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व इतर प्रमुख नेत्यांसह राजभवनाकडे रवाना झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार भाजप नेते महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांच्या दरबारी आव्हान देणार असल्याचं समजत. भाजप नेत्यांनी फ्लोअर टेस्टची मागणी केल्यानंतर राज्यपाल काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
दरम्यान, बंडखोर शिवसेना आमदार लवकरच महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती आज बंडखोर गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी दिली होती. अशातच आता भाजप विश्वासदर्शक प्रस्तावाची मागणी करण्यासाठी विधानभवनात पोहोचल्याने राज्यात येत्या काळात वादळी राजकीय घडामोडी घडणार असल्याचं दिसतंय.
पुढे काय होणार?
शिवसेनेचे बंडखोर आमदार हे भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची भूमिका सुरुवातीपासून मांडत आहेत. शिवसेनेने आपली मुलाची भूमिका असलेल्या हिंदुत्वापासून दूर जाऊ नये, काँग्रेस, राष्ट्रवादी या वैचारिक विरोधांसोबत मांडलेला संसार मोडावा अशा मागण्या केल्या आहेत. बंडखोरांची ही तीव्र भूमिका पाहता उद्धव ठाकरे यांची सहमती असो वा नसो ते भाजपसोबत जाणार असल्याचं स्पष्ट दिसतंय/
न्यायालयाची भूमिका
बंडखोर आमदारांवर करण्यात येणारी अपात्रतेची कारवाई येत्या १२ जुलैपर्यंत करू नये असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. अशावेळी फ्लोअर टेस्ट झाल्यास काय करायचे असा प्रश्न शिवसेनेच्या वकिलांनी केला होता. यावर न्यायालय जर तर अशा शक्यतांवर निर्णय देत नाही. जर अशी परिस्थिती उद्भवली तर न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत असं स्पष्ट करण्यात आलं होत.
न्यायालयाच्या या निकालामुळे राज्यपालांनी फ्लोअर टेस्टचे आदेश दिल्यास महाविकास आघाडी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावू शकते.