मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी शिवसेनेच्या बंडखोर गटाला उद्देशून भावनिक आवाहन केले. त्यानंतर रात्री त्यांनी वर्षा हे शासकीय निवासस्थान सोडून मातोश्री या मूळ निवासस्थानी मुक्काम हलवला. ठाकरे यांच्या त्या पाऊलांमुळे गंभीर बनलेल्या राजकीय पेचाला भावनिक वळण मिळाले.
बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे सायंकाळी गुवाहाटीत पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार होते. त्याआधी ठाकरे यांनी फेसबुकवरून भूमिका मांडताना बंडखोर गटाला काहीसा विचार करण्यास भाग पाडले. त्यामुळेच बहुधा शिंदे यांनी पत्रकार परिषदेचा बेत रद्द केला.
त्यानंतर ठाकरे यांचा वर्षा ते मातोश्री हा प्रवास मोठा इव्हेंट बनला. त्याचे कारण म्हणजे त्या प्रवासावेळी ठाकरे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी शिवसैनिकांनी केलेली मोठी गर्दी. ती गर्दी एकप्रकारे शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन घडवणारी ठरली.