नवी दिल्ली – ‘अग्निपथ’ योजनेंतर्गत चार वर्षांच्या कंत्राटीपद्धदीच्या जवान भरतीची उच्च वयोमर्यादा 21 वरून 23 वर्षे करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. गेली दोन वर्ष लष्करी भरती झाली नाही. कोविड साथीमुळे हा विलंब झाल्याने युवकांना त्याचा फटका बसला. पण आता ही वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयाचे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी समर्थन केले आहे. ते म्हणाले की त्यामुळे आता अधिक युवकांना रोजगार भरतीची संधी यातून मिळू शकणार आहे. जनरल पांडे म्हणाले की, लष्कराला वयात सूट देण्याचा सरकारचा निर्णय प्राप्त झाला असून लवकरच भरती प्रक्रिया जाहीर केली जाईल.
या निर्णयामुळे आमच्या अनेक तरुण, उत्साही आणि देशभक्त युवकांना लष्कर भरतीची संधी मिळेल. हे युवक लष्कर भरतीसाठी गेली दोन वर्षे तयारी करीत होते. पण त्यांना कोविड काळामुळे ही संधी मिळू शकली नव्हती. आता त्यांना ही संधी उपलब्ध होत आहे. भरती प्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. अधिकाधिक युवकांनी अग्निपथ योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.