नवी दिल्ली – लष्करातील भरतीच्या संदर्भात केंद्र सरकारने आणलेल्या अग्निपथ योजनेबाबत देशभरात गदारोळ सुरू असताना आणि राजकारण तापले असताना, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल पुढे सरसावले असून त्यांनी ही योजना देशाच्या दृष्टीने किती महत्वाची आणि आवश्यक आहे, याची माहिती दिली आहे.
आज युध्दाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलत चालले आहे. भारताच्या चारही दिशांना असलेले वातावरणही बदलत चालले आहे. तंत्रज्ञान झपाट्याने बदलते आहे. आपल्याला जर उद्याचा सामना करायचा असेल तर आजच तयारी करावी लागेल. कारण आपल्याला आपले राष्ट्रीय हित आणि राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण करायचे आहे, असे डोवाल यांनी म्हटले आहे.
अग्निपथकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघण्याची आवश्यकता असून ही योजना मागे घेण्याचा प्रश्नच उदभवत नाही असे त्यांनी स्पष्ट केले. केवळ पहिल्या चार वर्षांत भरती केलेले युवकच अग्निवीर असतील. ज्यांना सेवेत कायम ठेवले जाईल त्यांना पुढचे प्रशिक्षण दिले जाईल. कोणत्याही रेजीमेंटमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही.
विरोधाचे स्वर उठणे योग्यच आहे. प्रत्येक लोकशाही मत मांडण्याचा अधिकार असतो. मात्र कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला स्थान नसते व ते कदापि मान्य केले जाणार नाही. कोणताही बदल होत असतो तेव्हा चिंता किंवा काळजी ही त्याच्यासोबत येतच असते. आम्ही ते मान्य करतो. मात्र ज्यांना पूर्ण माहिती समजते आहे, त्यांचे मतही बदलते आहे. हा एक वर्ग आहे. त्याला देशाची चिंता आहे. मात्र एक दुसराही असा वर्ग आहे की ज्यांना देशाशी किंवा देशाच्या सुरक्षेशी काही देणेघेणे नाही. ते रेल्वे गाड्या जाळतात, दगडफेक करतात, समाजात संघर्ष निर्माण करतात. लोकांची दिशाभुल करतात.
ज्या युवकांना अग्निवीर व्हायचे आहे, त्यांनी सकारात्मक राहावे आणि देशावर, नेतृत्वावर आणि स्वत:वर विश्वास ठेवावा असे आवाहन त्यांनी केले. अग्निपथ हा राष्ट्राच्या हितासाठीच घेतलेला निर्णय असून राजकीय इच्छाशक्तीतूनच घेतला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय अन्य कोण अशी हिंमत करू शकतो अशी विचारणा त्यांनी केली.
आज जगात भारतातच तरूणांची संख्या सर्वाधिक आहे. 25 टक्के तरूणांना सर्वोत्तम प्रशिक्षण दिले जाईल आणि अनेक आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी तयार केले जाईल. संरक्षण दल प्रमुख अर्थात सीडीएस या पदाचा उल्लेख करत गेल्या आठ वर्षांत आपणे अनेक बदल केले असल्याचे सांगत त्यांनी आज आपल्याकडे एक 203 रायफल्सचाही समावेश केला जाणार असून ही अत्यंत आधुनिक अशी रायफल असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
चीनसोबतच्या संघर्षाचा उल्लेख करून ते म्हणाले की, चर्चेद्वारे तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र कोणत्याही प्रकारचे उल्लंघन सहन केले जाणार नाही. देशाच्या सीमांचे पूर्णपणे संरक्षण करण्याची खबरदारी आम्ही घेऊ असे त्यांनी शेवटी म्हटले आहे.