नेवासा (राजेंद्र वाघमारे) – कुठलीही सत्ता ताब्यात नसताना भाजपाचे बाळासाहेब मुरकुटे विधानसभा निवडणूक जिंकून आमदार बनले होते. मात्र, चालून आलेल्या संधीचे सोने करता न आल्यामुळे आमदारकीची संधी गमविण्याची वेळ त्यांच्या राजकीय चालीमुळे आली आहे. आता राजकीय आखाड्यात जनमताचा कौल नसतानाही मागच्यासारखी पुन्हा लॉटरी लागेल की काय? या अविर्भावात मुरकुटे रहात आहे. सत्ता असताना कामानिमित्त आलेल्या कार्यकर्त्यांना केवळ ‘हो, ना…हो,ना..’
करून ‘जयहरी अन् न्या हसन्यावारी’ केल्यामुळे आता त्यांना प्रचाराला माणसेच काय? उमेदवारही शोधावे लागत आहे. मुरकुटे म्हटल्यावर ‘नको रे बाबा…’ असे म्हणत आता स्वपक्षातील कार्यकर्त्यांनीही गप्प बसण्याची भूमिका घेतल्यामुळे नेवासा तालुक्यात भाजपाची अवस्था दयनीय झाल्याचे दिसून येत आहे. कार्यकर्त्यांविना मुरकुटे सध्या डौलात फिरताना दिसत आहे.
नगर जिल्ह्याच्या राजकारणात साखरसम्राटांची मोठी चलती असल्याचे तसेच ‘सोधा’ पक्षामुळे आप्तगण जपण्याचे काम राजकीय आखाड्यात पडद्याआडून सुरू रहात असल्याचे दिसून येत आहे. कुठलीही राजकीय सत्ता ताकद मागे नसताना अनाहूतपणे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटेंनी विधानसभेत विजय मिळविला. मिळालेल्या संधीचे सोने मुरकुटेंना करता न आल्यामुळे स्वपक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्तेही माजी आमदार मुरकुटेंवर आरोप करून पक्ष सोडताना दिसत आहे.
दोन महिन्यांपूर्वी नेवासा नगरपंचायतीचे गटनेते सचिन नागपुरे व शिष्टमंडळाने आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची लोणी येथे भेट घेऊन पक्षांर्तगत खदखद व्यक्त केली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे भाजपाचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी पक्षाला सरळ सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश करत आहेत. राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी विरोधकांना न दुखवता आपले विकासात्मक काम सुरू ठेवलेले आहे.
पंचायत समिती, जिल्हा परिषदेसह नगरपंचायतीवर त्यांनी एकहाती सत्ता मिळवून विकासात्मक कामे सुरू केलेले आहेत. पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांशी त्यांचा चांगला सुसंवाद घडत असल्यामुळे अनेक विरोधी पक्षातील नेतेमंडळी शिवसेनेत प्रवेश करताना दिसून येत आहे. माजी आमदार मुरकुटे यांच्या राजकीय चालीवर कार्यकर्ते बोटे मोडताना दिसू लागली आहेत. याकडे भाजपाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे नेवासा तालुक्यात सध्या तरी भाजपाची अवस्था म्हणजे ‘मोठे घर अन् पोकळवासा’ असल्याची टीका स्वपक्षातील कार्यकर्त्यांकडूनच केली जाऊ लागल्यामुळे पक्ष केवळ नावालाच उरल्याचे कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.