पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या आठ वर्षात देशात मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल होत आहेत. मात्र देशाचा विचार करता गेल्या दोन-तीन वर्षांत महाराष्ट्र सरकार आयटी आणि इलेक्ट्रानिक्स यात मागे पडला आहे. या क्षेत्रात तामिळनाडू, कर्नाटक या राज्याने आघाडी घेतली आहे, अशी टीका केंद्रीय माहिती तंत्रज्ञान तथा कौशल्य आणि उद्योजकता विकास राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी पुण्यात केली.
केंद्र सरकारच्या कार्याची माहिती देण्यासाठी चंद्रशेखर पुणे दौऱ्यावर आहेत. रविवारी मॉडर्न महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रशेखर यांनी गेल्या आठ वर्षांत मोदींची केलेल्या कार्याचा आढावा घेत करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर देश प्रगतीपथावर जात असल्याचे नमूद केले. यावेळी भाजप पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोयासटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे, निवेदिता एकबोटे उपस्थित होते.
चंद्रशेखर म्हणाले, इंटरनेट वापर सुरक्षिततेच्या दृष्टीने माहिती तंत्रज्ञान कायदा प्रस्तावित असून, त्यावर काम सुरू आहे. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप ला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले. त्याचीच प्रचिती म्हणून सध्या देशात 75 हजार स्टार्ट अप सुरू आहे. प्रत्येक महाविद्यालयात दहा-पंधरा स्टार्टअप आहेत. सध्या डिजिटल तंत्रज्ञानाचे प्रमाण वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून डिजिटल स्कील्स ही योजना सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे.’