मुंबई, – अरबी समुद्राच्या बाजूने मान्सूनने 29 मे रोजीच केरळात प्रवेश केला. त्यानंतर 31 मे रोजी मान्सून कर्नाटकच्या कारवारपर्यंत पोहोचला. पण अचानक हवामानात झालेल्या बदलामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला अडथळा निर्माण झाला. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून मान्सून कर्नाटकच्या कारवारमध्येच रेंगाळला आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण असल्याने लगतच्या बहुतांश भागांत मान्सूनने प्रवेश केला आहे. तसेच येत्या 5 दिवसांत राज्यात अनेक भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पश्चिम बंगालच्या काही शहरांसह, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या काही भागांत मान्सूनने धडक दिली आहे. याशिवाय, मेघालयमध्ये अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्ययुक्त वाऱ्यांमुळे कर्नाटक, केरळ, लक्षद्विप, तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या काही भागातही पाच दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
एकीकडे मान्सूनचा प्रवास मंदावला असला तरी तिकडे उत्तर आणि मध्य भारतात मात्र उष्णतेची लाट आली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या, उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भासह उत्तर भारतात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट असून ती आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.