पुणे – पावसाळ्याच्या तोंडावर महापालिकेकडून शहरातील पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या चेंबरची सफाईचे काम हाती घेतले आहे. मात्र, या चेंबरमधून काढलेला गाळ तातडीने उचलणे आवश्यक असतानादेखील तो चेंबरच्या बाजूलाच रचण्यात आला आहे. पाऊस पडताच पाण्यासोबत हा गाळ पुन्हा चेंबरमध्ये जाईल याची पूर्ण खबरदारी ठेकेदारांकडून घेण्यात आली असल्याचे चित्र शहरभर पाहायला मिळत आहे. परिणामी ठेकेदारांना महापालिका गाळ काढण्याचे आणि उचलण्याचे पैसे मोजणार असली तरी काम केवळ गाळ काढण्याचेच झालेले असून वाहतुकीचा खर्च लाटण्याचा घाट या प्रकारांमुळे समोर येत आहे.
याच्या तोंडावर महापालिकेकडून नाले-सफाई तसेच शहरातील पावसाळी वाहिन्यांच्या चेंबरच्या सफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी महापालिकेच्या ड्रेनेज विभागासह क्षेत्रीय कार्यालयाकडून स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यानुसार, चेंबरची सफाई करून त्यातील कचरा आणि गाळ बाहेर काढणे आणि तो वाहतूक करून त्याची विल्हेवाट लावणे हे काम देण्यात आले आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने त्यासाठी स्वतंत्र निविदाही काढल्या असून हे कामही सुरू केले आहे. मात्र, प्रत्यक्षात या ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांकडून केवळ चेंबरमधील कचरा आणि गाळ काढण्यात येत आहे. तर, काढलेला गाळ पुन्हा चेंबरपासून अवघ्या अर्धा फूटावर चेंबरमध्ये ज्या उताराने पाणी जाऊ शकते त्या उताराजवळ ठेवण्यात आला आहे.
शहरभर सुरू आहे प्रकार?
हा प्रकार शहरभर सुरू असल्याचे चित्र आहे. प्रत्यक्षात चेंबर सफाईच्या या कामावर क्षेत्रीय कार्यालय अथवा ड्रेनेजच्या कामांची तपासणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी करणे आवश्यक आहे. मात्र, सोयीस्कर या तपासणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. तर, या ठेकेदारांना गाळ काढण्याचे आणि उचलण्याचे फोटो सादर करणे अपेक्षित असले तरी प्रत्यक्षात केवळ एखादा फोटो काढून उर्वरीत गाळ तसाच ठेवला जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशाप्रकारांना जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.