पुणे: पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात राज ठाकरे यांची सभा सुरु आहे. यावेळी त्यांनी सर्वांवर त्यांच्या शब्दात समाचार घेत आहेत. सभेत राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला. दरम्यान, राज ठाकरे यांनी त्यांचे आंदोलन अर्धवट सोडल्याच्या आरोपाला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच सवाल केला आहे.
याविषयी बोलताना “मला एक आंदोलन दाखवा जे अर्धवट सोडलं. टोलनाक्याच्या आंदोलनानंतर ७० टोलनाके महाराष्ट्रातले बंद झाले. बाकीच्या पक्षांची काहीच जबाबदारी नाही का? मुंबईत बॉलिवुडमध्ये पाकिस्तानी कलाकार येत होते. या देशातून हाकलून दिलं त्यांना. कुठे होते त्यावेळी हिंदुत्वाची पकपक करणारे? जेव्हा रझा अकादमीच्या लोकांनी मोर्चा काढला आणि पोलीस भगिनींना घोळका करून त्यांच्या अब्रूवर हात घालण्यात आला. बाहेरचे मुसलमान तिथे आले होते. त्याच्याविरोधात फक्त मनसेनं मोर्चा काढला. बाकी कुणी नाही काढला. कोणतं हिंदुत्व बोलताय तुम्ही? उद्धव ठाकरेंनी एक गोष्ट सांगाव की तुमच्या अंगावर एका तरी आंदोलनाची केस आहे का? भूमिकाच कुठली घ्यायची नाही.”
मुख्यमंत्र्यांची सभा झाली. काय पोरकटपणा चालू आहे मला कळतच नाही. आमचं खरं हिंदुत्व, यांचं खोटं हिंदुत्व. वॉशिंग पावडर विकताय का तुम्ही? तुम्हारी कमीज हमारी कमीजसे सफेद कैसे? प्रश्न रिझल्ट्सचा आहे. जे आम्ही देतो.