मुंबई – महाराष्ट्र नननिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत पुन्हा एका वादग्रस्त विषयाला हात घालत, छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी लोकमान्य टिळकांनी उभारल्याचं म्हटलं आहे. यावरून महाराष्ट्राचं राजकारण तापलं असून संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड यांनी राज ठाकरे जातीवाद पसरवित असल्याचा आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली आहे.
माध्यमांशी भोलताना प्रविण गायकवाड म्हणाले की, लोकमान्य टिळकांनी शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जिर्णोधारासाठी पैसे जमा केले. मात्र जिर्णोधार केला नाही. शिवाजी महाराजांच्या समाधीचा जिर्णोधार इंदौरचे होळकर आणि ब्रिटीशांनी 1917 मध्ये केला. वास्तविक पाहता, लोकमान्य टिळकांनी ना समाधीचा जीर्णोद्धार केला, ना समाधी शोधली. महात्मा फुले यांनीच समाधी शोधली, त्यांच्यावर पोवाडा लिहिला आणि शिवजयंती सुरू केल्याचं, गायकवाड यांनी नमूद केलं.
दरम्यान लोकमान्य टिळक आणि पुण्यातील काही लोकांनी शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी पैसे जमा केले होते. परंतु, 1 ऑगस्ट 1920 रोजी टिळकांचा मृत्यू झाला. त्यामुळे जमा केलेल्या पैशांचा जीर्णोद्धारासाठी उपयोग झाला नाही, असंही गायकवाड यांनी म्हटलं.
यावेळी गायकवाड यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. राज ठाकरे खोटा इतिहास सांगून महाराष्ट्रातील वातावरण बिघडवत आहेत. तसेच राज्यात जातीवाद पसरविण्याचं काम राज ठाकरे करत असल्याचा आरोपही गायकवाड यांनी केला.