हा राष्ट्रीय पुरस्कार देशवासीयांना अर्पण
पुरस्काराची रक्कमही “नमामि गंगे’ प्रकल्पाला दिली देणगी
पुणे – “लोकमान्य टिळक म्हणजे स्वातंत्र्याच्या इतिहासाच्या माथ्यावरचा टिळा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळू शकते यावर विश्वास असलेल्या टिळकांनी सर्वसामान्य व्यक्तीला त्याच्या सामर्थ्याचा विश्वास दिला. जग भारताकडे भविष्य म्हणून पाहत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. लोकमान्य टिळकांच्या नावाने मिळालेल्या या पुरस्काराने जबाबदारी कैक पटीने वाढली असून, हा पुरस्कार आपण 140 कोटी भारतीयांना समर्पित करतो, असे मोदी म्हणाले. ज्यांच्या नावे हा पुरस्कार मिळाला त्या नावात “गंगाधर’ असल्याने या पुरस्काराची रक्कम “नमामि गंगे’ प्रकल्पाला देत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
“टिळक स्वराज्य संघ’ आणि “लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट’च्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते नरेंद्र मोदी यांना 41 वा “लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, पुणेरी पगडी, “केसरी’च्या पहिल्या अंकाची प्रतिमा, लोकमान्य टिळक वापरत होते तसेच उपरणे असे पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी राज्यपाल रमेश बैस, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित
पवार, ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे, रोहित टिळक, प्रणती टिळक आणि गीताली टिळक-मोने यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. भगवद्गीतेचा गुजराथी भाषेत भाषांतरित केलेला ग्रंथ यावेळी मोदींना भेटीदाखल देण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर मोदींनी आपल्या मनोगतातून उपस्थितांची मने जिंकली.
लोकमान्य टिळक आणि गुजरात यांचा संबंध उलगडताना मोदी यांनी सरदार पटेल यांचा दाखला दिला. स्वातंत्र्य आंदोलन काळात लोकमान्य टिळक हे अहमदाबाद येथील तुरुंगात होते. तेथून सुटल्यानंतर त्यांची सभा झाली आणि तिथे त्याकाळात 40 हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. त्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेलदेखील होते. त्यानंतर अहमदाबाद महापालिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर पटेल यांनी अहमदाबादमध्ये टिळक यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी टिळकांचे देहावसान झाले होते.
या पुतळ्यासाठी त्यांनी ब्रिटिश महाराणी व्हिक्टोरियाच्या नावाने बनवलेल्या उद्यानाची जागा निवडली. त्याला प्रचंड विरोध झाला परंतु सरदार हे सरदारच होते, त्यांनी “मी पद सोडेन पण पुतळा उभारला जाईल’ असे ठामपणे सांगितले. तो पुतळा उभारला गेला आणि त्याचे अनावरण खुद्द महात्मा गांधी यांनी केल्याचे, मोदी यांनी सांगितले. महात्मा गांधी यांनी “आधुनिक भारताचे शिल्पकार’ असे संबोधून लोकमान्य टिळकांचा गौरव केला होता, असेही मोदी यांनी यावेळी नमूद केले.
अण्णा भाऊ साठे, फुले दाम्पत्याचेही स्मरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेतून भाषणाला सुरुवात केली. तसेच लोकमान्य टिळकांबरोबरच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचेही स्मरण मोदींनी केले. “लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज 103 वी पुण्यतिथी आहे. देशाला अनेक महानायक देणाऱ्या महाराष्ट्राच्या भूमीला मी कोटी कोटी वंदन करतो. आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मी जितका उत्साहित आहे, तितकाच भावुकदेखील आहे. लोकमान्य टिळक हे स्वातंत्र्याच्या इतिहासाच्या माथ्यावरचा टिळा आहेत. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी समाज सुधारणेसाठी दिलेले योगदान असाधारण आहे. मी दोन्हीही महापुरुषांना नमन करतो. मला पुण्याच्या पावन भूमीवर, महाराष्ट्राच्या धरतीवर येण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे, असे मोदी मराठीतून म्हणाले.