पाचगणी – थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरचे वातावरण “हनी ट्रॅप’मुळे जोरात तापले. या हनी ट्रॅपच्या विषयात अनेकांनी मध्यस्थी तर काहींनी मदतीची याचना केल्याने प्रकरण थंडावले असले तरी या हनी ट्रॅपचा डर्टी हिरो कोण, याबाबत महाबळेश्वर शहरात चर्चेला उधाण आले आहे.
त्याचे झाले असे की, काही दिवसांपूर्वी महाबळेश्वर शहरातील एका व्यापाऱ्यावर व्हॉटसऍपच्या माध्यमातून हनी ट्रॅपचा सापळा रचला गेला होता. दरम्यानच्या काळात दोन्ही बाजूंनी मर्यादा ओलांडत आदानप्रदान झाल्याने नंतर संबंधित व्यापाऱ्याला ब्लॅकमेल करण्याचा गोरख धंदा सुरू झाला. त्यावेळी हे प्रकरण थेट महाबळेश्वरच्या पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांनी घडला प्रकार कथन करून संबंधित व्यापाऱ्याला तक्रार देण्याबाबत सूचना केली होती.
मात्र, बदनामीच्या काळजीने भेदरलेल्या व्यापाऱ्याला वाचवण्याकरीता काही जण धावले अन् प्रकरण रफादफा करण्यात आल्याची चर्चा दबक्या आवाजात शहरात सुरु झाली. त्यावर पोलिसांशी संपर्क साधून माहिती घेतली असता, तक्रारदारांना तक्रार देण्याबाबत सांगूनही त्यांनी चर्चेने विषय मिटवत असल्याचे सांगितल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या हनी ट्रॅपबाबतही उलटसुलट चर्चा सुरू असून ट्रॅप की बनाव याबाबत अद्याप स्पष्टीकरण मिळाले नाही.
या प्रकरणात कमालीची खबरदारी घेत प्रकरण दाबण्याकरीता मोठमोठ्या लोकांनी प्रयत्नाची पराकाष्टा केल्याचे बोलले जात आहे. संबंधित व्यापारी प्रतिष्ठीत असून त्याला व्हॉटसऍपच्या माध्यमातून गळाला लावण्याचा काहींचा प्रयत्न होता. मात्र, हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचल्यावर पोलिसी हिसका सोसणार नसल्याची जाणीव झाल्याने संबंधित डर्टी हिरो पुरता घायाळ होत थंड महाबळेश्वमध्ये घामाघूम झाल्याचे बोलले जात आहे.
त्यानंतर या घायाळ हिरोला वाचवण्याकरीता अनेक व्हाईट कॉलर लोकांनी यात उडी घेतली. प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले अन् पीडिताने तक्रार देण्यास नकार दिल्याने हनी ट्रॅपच्या सिनेमाचा क्लायमॅक्स बदलून गेला. ऐनवेळी तक्रारदाराने नुर बदलल्यामुळे पोलीसांना देखील हात चोळत बसावे लागले. या सगळ्या भानगडीमुळे शहराच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचा प्रयत्न काही जणांनी करण्याचा प्रयत्न केला.
खरच संबंधित व्यापाऱ्याला ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला असेल तर त्या व्यापाऱ्याने तक्रार देण्यास टाळाटाळ करण्याचे कारण काय, हनी ट्रॅप होता तर काही मेसेज करण्यापूर्वीच संबंधित व्यापाऱ्याने सावधानता बाळगली का नाही, हे सवाल महाबळेश्वरकरांना पडले असून त्याची उत्तरे संबंधितांना भविष्यात द्यावी लागतील.