खेळ कोणताही असो त्यात काही खेळाडू असे असतात की, त्यांना फार कष्टच करावे लागत नाहीत. त्यांचा खेळ नैसर्गिक असतो म्हणा किंवा त्यांना दैवी देणगी मिळालेली असते म्हणा. अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू रशिद खान हा देखील असाच नैसर्गिक गुणवत्ता असलेला खेळाडू.
क्रिकेटचे धडे गिरवण्यासाठी त्याला त्याच्याच देशात फारशी संधी मिळाली नाही. त्यांचा देश अनेक समस्यांनी घेरलेला आहे. त्यात रशिदला क्रिकेटसाठी अनुकूल वातावरण मिळालेले नसले तरीही त्याच्यातील क्रिकेटपटू लपून राहिला नाही. त्याची गुणवत्ता जगासमोर आलीच. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत रशिदने खरेतर त्याच्या भेदक लेग स्पीन गोलंदाजीवर यश मिळवायला हवे तर हा पठ्ठ्या फलंदाजीत हाहाकार माजवत आहे. त्याच्याकडे फलंदाजीची क्षमता असल्याचे सातत्याने सांगितले जात होते. मात्र, ती सिद्ध झाली ती यंदाच्या आयपीएल स्पर्धेत. त्याचे पाय जणू खेळपट्टीवर चिकटलेले असावेत अशी त्याची फलंदाजीची शैली आहे.
मुंबईच्या भाषेत सांगायचे तर खडे खडे खेलना ज्याला म्हणतात तसा हा फलंदाजी करतो. त्याची फलंदाजीची शैली पाहिली की, अमेरिकेतील बेसबॉलपटूंची शैली आठवते. पाय जराही न हलवता चौकार व षटकार मारण्याची त्याची खासियत त्याला अन्य खेळाडूंपेक्षाही भिन्न ठरवते. त्याचा सर्वात पहिला फटका चेन्नई सुपर किंग्जला बसला. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादही त्याच्या कचाट्यात सापडला.
नियमित कर्णधार हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत चेन्नईविरुद्ध खेळताना त्याने गमावलेला सामना गुजरात टायटन्सला आपल्या वादळी फलंदाजीच्या जोरावर जिंकून दिला. या सामन्यात त्याने 21 चेंडूत 2 चौकार व 3 षटकारांच्या आतषबाजीने 40 धावांची खेळी केली. याच स्वरूपाच्या आक्रमक खेळीची पुनरावृत्ती त्याने हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही केली. त्याने 11 चेंडूत 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 31 धावांची खेळी केली व गुजरातचा विजय साकार केला.
खरेतर चेन्नई व हैदराबादविरुद्धचे सामने गुजरातच्या हातातून निसटले होते. मात्र, रशिदच्या फटकेबाजीने हे सामने गुजरातने जिंकले. त्याची फलंदाजी पाहून अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनाही आश्चर्य वाटले. गेली कित्येक वर्षे रशिद त्याच्या लेग स्पीन गोलंदाजीच्या जोरावर सामने जिंकून देत आला आहे. यंदाच्या मोसमात मात्र तो फलंदाजीच्या जोरावर सामने जिंकून देताना दिसत आहे.
वेस्ट इंडीजच्या क्रिकेटपटूंना नैसर्गिक गुणवत्ता लाभलेले क्रिकेटपटू असो संबोधले जाते. मात्र, रशिद खानही याच पठडीतील असल्याचे सिद्ध होत आहे. चार वर्षांपूर्वी जागतिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलेला हा गुणवान गोलंदाज आता फलंदाज म्हणूनही नावारूपाला येत आहे, यात शंका नाही. आता आयपीएल स्पर्धेतील आगामी सामन्यांतही त्याच्या गोलंदाजीपेक्षाही जास्त चर्चा व कुतूहल त्याच्या फलंदाजीचेच राहील.