नगर -राज्याच्या ग्रामीण भागातील गावागावातील सरपंचांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी, विविध मागण्या शासन दरबारी मांडून त्याचा पाठपुरावा करणारी सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र ही सरपंचांसाठी हक्काचे व्यासपीठ आहे. सरपंच परिषदेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.
सरपंच परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व साप्ताहिक आदर्श सरपंच याचे प्रकाशन शुक्रवारी आदर्श गाव हिवरे बाजार मध्ये पद्मश्री पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी आमदार सुरेश धस, आमदार प्रशांत बंब, आमदार निलेश लंके, अंमलबजावणी संचालनायचे उपायुक्त उज्वल कुमार चव्हाण, विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी, सोलापूर जि .प. च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, सचिव विकास जाधव, महिला उपाध्यक्षा अश्विनी थोरात, नगर जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे,राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे उपस्थित होते.
राज्यातील 9 सरपंच, 1 उपसरपंच, 5 ग्रामसेवक, 4 ग्रामपंचायत, 4 समाजसेवा, 4 आदर्श लोकप्रतिनिधी, 4 आयएएस अधिकारी यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. या पुरस्कारांमध्ये नगर जिल्ह्यातील पारनेरचे आमदार निलेश लंके यांना आदर्श लोकप्रतिनिधी, सारोळा कासार (ता.नगर) चे उपसरपंच जयप्रकाश पाटील यांना आदर्श उपसरपंच, निंबळकच्या ग्रामविकास अधिकारी सविता लांडे व गुंडेगावचे ग्रामविकास अधिकारी अशोक जगदाळे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देवून गौरविण्यात आले.