सातारा – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेले वक्तव्य माझ्या बुध्दीला पटणारे नाही. महत्वाच्या पदावरील व्यक्तींनी अशी वक्तव्ये करु नयेत, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सौ. सुप्रिया सुळे यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. दरम्यान, गेली दोन वर्षे करोनाचे कारण सांगून केंद्र सरकारने खासदार निधी न दिल्याने विकासकामांना ब्रेक मिळाला असून याबाबत खासदारांमध्ये नाराजी असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या निवासस्थानी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस भवनास त्यांनी भेट दिली.
यावेळी आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, युवक जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, राजेंद्र लावंघरे, शफिक शेख आदी उपस्थित होते. खासदार सुळे म्हणाल्या, “राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार भक्कम असून केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत आहे. वास्तविक यापूर्वी कधीही सुडबुध्दीने कारवाया होत नव्हत्या. केंद्रातील भाजप सरकार मात्र चुकीच्या पध्दतीने काम करुन त्रास देत आहे.
राज्यातील वातावरण कलुषित करण्याचे प्रकार सुरु असून सरकार सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे.’ आ. अमोल मिटकरी नेमके काय म्हणाले हे मला माहित नाही मात्र राज्यपाल कोश्यारी काय म्हणाले हे संपूर्ण देशाने ऐकले आहे. महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल कोश्यारी यांनी केलेले वक्तव्य माझ्या बुध्दीला न पटणारे आहे. नवनीत राणा यांच्याबद्दल मला फारसे काही माहिती नाही, अशी उत्तरे सुप्रिया सुळे यांनी काही प्रश्नांवर दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ताकद राज्यात वाढत असून यामध्ये महिला आघाडीचाही मोठा वाटा आहे. महिला पदाधिकाऱ्यांनाही निर्णय प्रक्रियेत संधी दिली जात आहे. महिलेवर अन्याय करणारा कोणीही असू त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असेही सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.