मुंबई – महाराष्ट्रातील राजकीय संघर्ष संपण्याचे नाव घेत नाही. लाऊडस्पीकरच्या वादानंतर आता फोन टॅपिंगच्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना नेते संजय राऊत, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन समाजविघातक घटक या नावाखाली टॅप करण्यात आल्याचे मुंबई पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.
पोलिस तपासात सापडलेल्या राज्य गुप्तचर विभागाच्या (एसआयडी) पत्रातून ही बाब समोर आली आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तपासात एक पत्र समोर आले होते. गृहविभागाच्या सचिवांना फोन टॅपिंगच्या परवानगीसाठी लिहीलेल्या या पत्रात संजय राऊत, एकनाथ खडसे यांचे फोन नंबर होते. मात्र त्यांच्या नावापुढे नावं न देता समाजविघातक घटक असे नमूद करण्यात आले होते.
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले होते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा तब्बल 60 दिवस फोन टॅप करण्यात आला होता तर एकनाथ खडसे यांचा 67 दिवस फोन टॅप करण्यात आला होता.
रश्मी शुक्ला यांच्यावर टेलिग्राफ अॅक्टनुसार गुन्हा दाखल आहे. फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत आरोप केले होते. राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना डॉ. रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे.