नवी दिल्ली – आसाम आणि मेघालय या दोन राज्यांमध्ये गेल्या 50 वर्षांपासून जो सीमावाद होता त्यावर आता तोडगा निघाला आहे. त्या विषयीच्या समझोत्यावर दोन्ही राज्यांच्यावतीने आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा आणि मेघालयाचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी आपसात चर्चा करून हा अंतिम तोडगा काढला आहे. यावेळी दोन्ही राज्यांचे वरीष्ट अधिकारी आणि केंद्रीय गृहमंत्रालयाचे अधिकारीही उपस्थित होते. दोन्ही राज्यांच्या दरम्यान 884 किमीची सीमा आहे.
त्यातील 12 केंद्रे विवादास्पद होती. या विवादास्पद भागाची एकूण जमीन 36.79 किमी आहे. त्यातील 18.51 किमी अंतराचा भाग आसामला, आणि 18.28 किमीचा भाग मेघालयाला मिळणार आहे.
या सीमेचा वाद अलिकडेच विकोपाला गेला होता. व त्यातून दोन्ही राज्यांतील सुरक्षा दलांमध्ये संघर्षाची स्थिती उद्भवली होती. त्यातून झालेल्या हिंसाचारात आसामच्या पाच सुरक्षा जवानांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. यावरून दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांच्या विरोधात अत्यंत कडक भाषाही वापरल्याने या तणावात भरच पडली होती.