मुंबई : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष काँग्रेसबद्दल केलेली टिप्पणी चर्चेत आहे. भाजपच्या तगड्या नेत्याची प्रतिमा असलेल्या गडकरींच्या बोलण्यात काँग्रेसबद्दल सहानुभूती आणि प्रोत्साहन दिसून येत होते.
एका कार्यक्रमात गडकरी म्हणाले की, लोकशाहीसाठी काँग्रेस मजबूत असणे आवश्यक आहे. सलग निवडणुकीत पराभूत होणारी काँग्रेस पुन्हा मजबूत व्हावी आणि पक्षाचे नेते निराश होऊन पक्ष सोडू नयेत, हीच आपली ‘इच्छा’ आहे, असेही ते म्हणाले.
कमकुवत काँग्रेस म्हणजे मुख्य विरोधी पक्षाची जागा प्रादेशिक पक्ष घेत आहेत, हे चांगले लक्षण नाही, असेही गडकरी म्हणाले.
पत्रकारिता पुरस्कार कार्यक्रमात केंद्रीय मंत्री म्हणाले, ‘लोकशाही दोन चाकांवर चालते- सत्ताधारी व्यवस्था आणि विरोधक. प्रबळ विरोधी पक्ष ही लोकशाहीची गरज आहे. त्यामुळे काँग्रेस मजबूत असावी अशी माझी इच्छा आहे. त्याचवेळी काँग्रेस कमकुवत असताना त्याचे स्थान प्रादेशिक पक्ष घेत आहेत, जे लोकशाहीसाठी चांगले नाही. अशा स्थितीत विरोधी पक्ष मजबूत झाला पाहिजे, असंही मत त्यांनी मांडलं.