ममता बॅनर्जी यांनी दिले पोलीस प्रशासनाला कारवाईचे आदेश
कोलकाता – बीरभूम जिल्ह्यात आठ जणांची जमावाकडून जाळून हत्या केली गेलेल्या गावाला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज भेट दिली. या प्रकरणातील संशयितांनी जर आत्मसमर्पण केले नाही तर त्यांना शोधून काढण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. या हत्याकांडामागे राजकीय हेतू असल्याचा दाट संशयही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
“आधुनिक बंगालमध्ये अशा प्रकारचे क्रूर कृत्य होऊ शकेल, अशी मला कधी कल्पनाही नव्हती. माता आणि बालकांनाही मारून टाकण्यात आले आहे. आपल्या कुटुंबातील सदस्य गेल्यामुळे हृदय पिळवटून गेले आहे.’ असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. यावेळी मयत व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांच्या गराड्यामध्ये त्या बोलत होत्या.
या प्रकरणामागे काही मोठे कारस्थान असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. या सर्व हत्याकांडामागे असलेल्या दोषींना पोलीस शोधून काढतील आणि त्यांना कठोर शिक्षाही दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. या संदर्भात न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणामध्ये कोणतीही त्रुटी राहू दिली जाऊ नये, अशी स्पष्ट सूचनाही ममता बॅनर्जी यांनी पोलिसांना दिल्या
ममता बॅनर्जी यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पाचारण करून या संदर्भातील तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेशही दिले. या संदर्भात कोणतेही कारण ऐकून घेतले जाणार नाही. दोषींवर कारवाई व्हायलाच पाहिजे. साक्षीदारांना संरक्षण मिळायला पाहिजे. ज्यांचे घर जळून गेले आहे, त्यांच्या घराची दुरुस्ती करण्यासाठी तत्काळ 2 लाख रुपये देण्याची सूचनाही त्यांनी केली. या प्रकरणातील पीडित कुटुंबातील सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
जमावाने घरात कोंडून घर पेटवून दिल्यामुळे तीन महिला आणि दोन मुलांसह एकूण आठ जणांचा जळून मृत्यू झाला होता. रामपूरहाटमधील बोगतुई गावात ही घटना घडली होती. स्थानिक तृणमूल कॉंग्रेसचा नेता भंडू शेख क्रूडबॉम्बच्या हल्ल्यात मारला गेल्यानंतर झालेल्या प्रतिक्रियेतून हे हत्याकांड झाले होते. या हत्याकांडामागे राजकीय वैमनस्य असल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येतो आहे.