मुंबई – राज्यात 2 वर्षांतील चित्र पाहून असे वाटते की, ही महाविकास आघाडी नव्हे, तर महाविनाश आघाडी आहे. पण आता हेही लक्षात आले की ही मविआ म्हणजे “मद्य विक्री आघाडी’ आहे, असा टोला लगावत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्था अशा विविध विषयांवर विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, करोना काळात मंदिर बंद होती, पण मदिरालय सुरू ठेवली. क्लास बंद होते, पण ग्लास सुरू होते.
विद्यार्थ्यांच्या टॅब खरेदीतही घोटाळा, भंगारात घोटाळा, पेंग्विन देखभालीत घोटाळा, ई-टेंडरमध्ये घोटाळा, कोविड सेंटर उभारणीत घोटाळा, साहित्य खरेदीत घोटाळा अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीत फक्त घोटाळा, असे म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या घोटाळ्यांचा पाढा वाचला. पदाधिकाऱ्यांच्या कंपन्यांनाच कामे दिली जात आहेत, बदल्यांमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे. मुंबई मेली तरी चालेल, यांचे घर भरणे सुरू आहूे, असे म्हणत त्यांनी शिवसेनेवरही टीकास्त्र डागले.
कवितांचा हवाला देत भ्रष्टाचारावर बोट
देवेंद्र फडणवीसांनी काही कवितांचा हवाला देत सरकारच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवले. पी. एल. बामनिया नावाचे कवी आहेत. त्यांची कविता सद्याचे सरकार कसे आहे, याची जाणीव करून देते. तुम चाहो तबेलो को बाजार कह दो। तुम चाहो पतझडो को बहार कह दो !, असे फडणवीसांनी अधोरेखित केले. तसेच विंदा करंदीकर यांची कविता सद्याच्या राजकारणावर भाष्य करते. लोकांसाठी सरकार असते, याची थोडीही जाणीव दिसत नाही. कविवर्य विंदा करंदीवर म्हणतात, सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते !! तेच ते !!, असेही ते म्हणाले.