नवी दिल्ली – पंजाबमध्ये काँग्रेसचं वर्चस्व भेदून आम आदमी पक्षाने सत्ता काबीज केली. त्यानंतर लगेचच राज्यसभेच्या पाच जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. त्यामुळे पंजाबमधील राज्यसभेच्या पाच जागांसाठी उमेदवारांच्या निवडीपासूनच आम आदमी पक्ष विरोधकांच्या निशाण्यावर आहे.
पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. राज्यसभेच्या उमेदवारांच्या माध्यमातून दिल्लीत बसलेल्या लोकांना पंजाब सरकारवर नियंत्रण ठेवायचे आहे, असा आरोप नवज्योत सिंग सिद्धू यांनी केला आहे.
नवज्योतसिंग सिद्धू यांनी ट्विट करून म्हटले की, दिल्लीच्या रिमोट कंट्रोलसाठी नवीन बॅटरी सापडली आहे. आता रिमोट चमकत आहे. हरभजन सिंग हा अपवाद वगळता बाकी सर्व काही दिल्लीच्या रिमोट कंट्रोलसाठी बॅटरी आहे. हा पंजाबशी विश्वासघात असल्याचं त्यांनी म्हटलं. यावेळी सिद्धू यांनी हरभजन सिंग हे राज्यसभेसाठी उत्तम पर्याय असल्याचे म्हटले आहे.
माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग व्यतिरिक्त आम आदमी पार्टीने दिल्लीतील आप आमदार राघव चढ्ढा आणि संदीप पाठक यांना राज्यसभेवर पाठवले आहे. याशिवाय पंजाबमधील अशोक मित्तल आणि संजीव अरोरा या दोन बड्या उद्योगपतींना आम आदमी पक्षाने उमेदवारी दिली आहे.
पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला ९२ जागा जिंकण्यात यश आले आहे. विधानसभा निवडणुकीतील या मोठ्या विजयामुळे राज्यसभेच्या पाचही जागा आम आदमी पक्षाच्या खात्यात जातील हे निश्चित आहे.