इंदोरी (पिंपरी) – इंदोरी येथील बैलगाडा शर्यतीचा घाट, शौकीनांनी केलेली एकच गर्दी अशातच भिर्रर्र…. झाली…. अशी आरोळी कानी पडत असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बैलगाड्याने 12 सेकंदात इंदोरीचा घाट पार केला. त्यानंतर उपस्थितांनी केलेला जल्लोष हा बैलगाडा शर्यतींमधील उत्साह द्विगुणीत करणारा ठरला.
मावळ तालुक्यातील इंदोरी येथील महाहिंदकेसरी घाट येथे निमंत्रित बैलगाडा शर्यतीचे रविवारी (दि.20) आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी फडणवीस हे बैलगाडा मालक असल्याचे सांगत, त्यांचा बैलगाडा घाटात सोडण्यात आला. या बैलजोडीने अवघ्या 12 सेकंदात घाट पार केल्याने घाटात बैलगाडाप्रेमींनी एकच जल्लोष केला.
या स्वागताचा स्विकार करत फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस शेतकऱ्यांच्या बैलांचा आहे. जे लोक बैलगाडा शर्यतीवर बंदी आणण्याचा विचार करतात त्यांनी एकदा मावळात येऊन हा उत्सव त्यांनी पहावा ; तसेच मला आनंद आहे अनेक वर्षाच्या संघर्षानंतर आपण पुन्हा बैलगाडा शर्यत सुरू करू शकलो. आमचा शेतकरी आपल्या बैलांना पोटच्या पोरासारखं वागवतो त्या बैलांना आपल्या परिवारामध्ये सामील करतो मला आनंद आहे माझा गाडा देखील याठिकाणी धावला आणि तो प्रथम आला.तुम्ही ठरवलं की माझा नंबर पहिला येतोच मावळच्या धर्तीवर ज्याचा बैलगाडा पहिला आला त्याला कुणीही थांबवू शकत नाही.
या समारंभास माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, आमदार महेश लांडगे, रविंद्र भेगडे, साहेबराव काशीद, नितीन मराठे, दिलीप ढोरे, रमेश घोजगे, रविंद्र शेटे, संदिप काशीद तसेच बैलगाडा प्रेमी लाखोंच्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धचे आयोजन भाजपचे मावळ तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे आणि युवा नेते रविंद्र शेटे यांनी केले.