आळंदी – श्रीक्षेत्र देहू येथे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा बीज सोहळा रविवारी (दि. 20) अतिशय धार्मिक वातावरणात पार पडला. त्यानिमित्त अलंकापुरीत देखील भाविकांनी पहाटेपासूनच इंद्रायणी तीरावर पवित्र स्नानासाठी गर्दी केली होती.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या उत्साहाने अलंकापुरी नगरित येऊन दाखल झाले होते. दोन वर्षांपासून करोनामुळे राज्यातील सर्व तीर्थ क्षेत्रातील यात्रा, जत्रा, सामुदायिक सोहळा हे बंद होते. गेल्या महिन्यापासून करोनाचे सावट कमी झाल्याने निर्बंध देखील शितील करण्यात आल्याने यात्रा जत्रा भरवण्यात मोठा उत्साह वाढत आहे. त्यामुळे रविवारी श्रीक्षेत्र देहू येथे लाखो भाविक तुकारामांच्या भेटीसाठी व बीज सोहळा पार पाडण्यासाठी देहू नगरित टाळ-मृदंगाच्या गजरात दाखल झाले होते.
त्याचबरोबर प्रथम अलंकापुरीत ज्ञानराजाचे दर्शन व नंतर तुकोबारायांची भेट असा क्रम करीत गेली दोन दिवस अलंकापुरी भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती. रविवारी पहाटे माऊली मंदिरात देवस्थानच्या वतीने नित्याचे धार्मिक कार्यक्रम नियोजित वेळेनुसार पार पडले. तसेच भाविकांना माऊलींचे दुरून दर्शन रांगेमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने देण्यात येत होते.
स्वकाम सेवेची स्वच्छता मोहीम देखील परंपरेप्रमाणे सुरू होती असे अध्यक्ष सुनील तापकीर यांनी सांगितले तसेच आळंदी तसेच दिघी पोलीस ठाण्याचे वाहतूक विभाग, सर्व अधिकारी कर्मचारी भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत होते. दिवसभर वाहतूक अगदी सुरळीतपणे नियोजनबद्ध पद्धतीने सुरू होती. पीएमपीएमएल तसेच खासगी वाहनाने भाविक आळंदी व देहूकडे मार्गस्थ होत होते. देवस्थानने देखील भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन हा बीज सोहळा अतिशय धार्मिक उत्साही वातावरणात पार पडल्याचे देवस्थानचे प्रमुख व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.