नवी दिल्ली – पाच राज्याच्या निवडणूकीचे निकाल लागायला काही तासांचा अवधी बाकी असताना राजधानीत सत्ताधारी आणि विरोधक पक्षांतील नेत्यांचे बैठकीचे सत्र सुरु झाले आहेत. एक्झिट पोलच्या आकड्यांनी राजकीय हवा तापली आहे. एक्झिट पोलमध्ये गोवा आणि उत्तराखंडमध्ये काट्याची लढाई सांगितली जात आहे. त्यामुळे या राज्यांबरोबरच दिल्लीतही बैठका सुरू आहेत.
कॉंग्रेस यूपी वगळता चार राज्यांत ज्येष्ठ नेत्यांना पाठवत आहे. पक्षाने गोव्यात आपले उमेदवार रिसॉर्टमध्ये पाठवले आहेत. उत्तराखंडमध्येही दोन्ही पक्षांची तशीच तयारी सुरू आहे. निकाल आल्यानंतर आमदार फुटू नयेत हा या तटबंदीचा हेतू आहे. पंजाबमध्ये कॉंग्रेस बहुमतापासून थोडा दूर राहील, असे पक्षाचे आकलन असून त्यासंदर्भात रणनीती तयार केली जात आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. ते गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यास मुंबईला गेले. सावंत म्हणाले, कॉंग्रेस पराभवाच्या भीतीने जमवाजमव करत आहे. दरम्यान, भाजप नेते मगोप आणि अपक्ष उमेदवारांच्या संपर्कात आहेत. दुसरीकडे कॉंग्रेस नेते तृणमूल व आपच्या संपर्कात आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित चन्नी आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती. कॅप्टन दिल्लीतच आहेत. चन्नी यांनी भाक्रा-ब्यास व्यवस्थापन मंडळाबाबत शहांची भेट घेतली आहे. तथापि, ही भेट निवडणुकीशी जोडली जात आहे. सूत्रांनुसार, कॉंग्रेसचे काही नेते कॅप्टन यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे.
उत्तराखंडात स्थिती अनुकूल असल्याचे कॉंग्रेसचे मत आहे. पक्षाने राज्याची जबाबदारी छत्तीसगडचे सीएम भूपेश बघेल यांना दिली आहे. गोवा कॉंग्रेसच्या दाव्यानुसार मतदान भाजपविरुद्ध झाले आहे. तरीही कॉंग्रेस 16-19 जागांवरच अडकू शकते. त्यामुळे पुढील रणनीतीसाठी कॉंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी कर्नाटकचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना पाठवले आहे.