नाशिक :- ऑफलाईन परीक्षेबाबत आरोग्य विज्ञान विद्यापीठाने देशात आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या एकविसाव्या दीक्षान्त समारंभप्रसंगी केले.
विद्यापीठाच्या ऑनलाईन दीक्षान्त समारंभ कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षेतखाली झाला. या कार्यक्रमास सन्माननीय अतिथी म्हणून प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्रीअमित देशमुख तसेच सन्माननीय अतिथी म्हणून नवी दिल्ली येथील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक तथा केंद्र सरकारच्या आरोग्य संशोधन विभागाचे सचिव प्रा.डॉ. बलराम भार्गव उपस्थित होते.
याप्रसंगी कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) प्र. कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता डॉ. सचिन मुंब्रे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ. राजश्री नाईक, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी श्री. एन.व्ही. कळसकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
दीक्षान्त समारंभाच्या अध्यक्षीय भाषणात कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले, कोविड-19 च्या काळात आरोग्य विद्यापीठाने उल्लेखनीय काम केले याबद्दल मला अभिमान आहे. या परिस्थितीत ऑफलाईन पध्दतीने प्रत्यक्ष परीक्षा घेऊन विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावर आदर्श निर्माण केला आहे. आरोग्य आणि शिक्षण या मुलभूत गोष्टींने समाजाचा विकास होतो. विद्यापीठ हे संशोधनाचे केंद्र असावे. आरोग्य क्षेत्रात नवनवीन संकल्पना पुढे येत असून याबाबत समतोल राखण्याकरिता समाजाच्या आवश्यकतेनुसार विद्यापीठाने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रगती साध्य करावी. तसेच समाजाच्या आरोग्य हिताच्या दृष्टीने सर्व विद्याशाखांनी एकत्र येऊन भरीव कार्य करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात विद्यापीठाने विविध सामाजिक व संशोधानात्मक उपक्रमांना प्राधान्य द्यावे. नवीन कीर्तीमान भारत घडविण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रातील कला आत्मसात कराव्यात, जेणेकरुन भावी डॉक्टरांचे व्यक्तीमत्व अधिक चांगले होईल. विद्यार्थ्यांनी ‘राष्ट्र देव भव’ उक्तीप्रमाणे कार्य करावे. प्रत्येक रुग्णाची सेवा ही राष्ट्राची सेवा आहे अशा भावनेने काम केल्यास खरी समाजसेवा होईल असे, राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी सांगितले.