प्रयागराज – उत्तर प्रदेशच्या विधानसभेची निवडणूक सर्वसाधारण नसून उत्तर प्रदेशातील लोकशाही वाचवण्यासाठीची आणि भविष्य बदलण्याची आहे, असे प्रतिपादन समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादवयांनी केले आहे. यमुनापारच्या भिरपूर येथील जाहीर सभेमध्ये बोलताना त्यांनी “जेंव्हापासून भाजपचे सरकार अस्तित्वात आले तेंव्हापासून महागाई आणि बेरोजगारी वाढली’ असल्याचीही टीका केली.
भाजपचे छोटे नेते छोट्या प्रमाणात खोटे बोलतात. मोठे नेते मोठ्या प्रमाणात खोटे बोलतात आणि सर्वात मोठे नेते सर्वात मोठे खोटे बोलतात, अशी उपरोधिक टीकाही अखिलेश यादव यांनी केली. बी.एड आणि टीईटीच्या परीक्षा रद्द केल्या गेल्या नव्हत्या का? पेपर लीक झाले नव्हते का? विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागला नव्हता का? असे प्रश्नही अखिलेश यांनी विचारले. समाजवादी पार्टीने शिक्षा मित्रांना मदत करण्याचे आणि शैक्षणिक क्षेत्रातील लाखो रिक्त जागा भरण्याचे वचन दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.
भाजपच्या सरकारमध्ये बाबा आदित्यनाथ यांनी योजनांची नावे बदलून विकास करून दाखवला. आता एका इंग्रजी वर्तमानपत्राने त्यांचे नावही बदलून “बाबा बुलडोझर’ असे केले असल्याचे अखिलेश यांनी सांगितले.
सभेनंतर अखिलेश यांच्या हेलिकॉप्टरजवळ नागरिकांची गर्दी झाल्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला.