मस्कत – विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवण्याचे षडयंत्र पूर्वीच ठरले होते. आता फक्त त्याची अंमलबजावणी झाली आहे. मुळातच कोहलीला येत असलेले यश अनेकांच्या डोळ्यात खुपत होते, अशा शब्दात भारतीय संघाचे माजी कसोटीपटू व माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कोणाचेही नाव न घेता ताशेरे ओढले आहेत.
कोहली खूप कमी कालावधीत जगातील सर्वात सरस फलंदाज ठरला. त्याने अनेक यशोशिखरे पादाक्रांत केली. त्याने एक फलंदाज म्हणून तसेच कर्णधार म्हणून अनेक स्पर्धांमध्ये भारताला जागतिक मक्तेदारी मिळवून दिली. केवळ त्याला कर्णधार असताना आयसीसीच्या एकाही मोठ्या स्पर्धेचे यश मिळवता आले नाही. पण काही लोकांनी हाच मुद्दा मोठा ठरवला व त्याच्या बाकी यशाके दुर्लक्ष केले, असेही शास्त्री यांनी सांगितले आहे.
कोहलीचा राजीनामा प्रकरण आता इतिहास जमा झाले आहे. आपल्याला त्याच्या निर्णयाचा सन्मान केला पाहिजे. परदेशातील कोहलीची कामगिरी अविश्वसनीय आहे. भारताने त्याच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दित ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये विजय साकार केला. आपण दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 2-1 असे पराभूत जालो, मात्र तरी देखील अजून कोहलीने नेतृत्व केले पाहिजे की नाही यावर विचार करावा लागत आहे हेच कोहलीचे यश आहे. कोहलीने भारताचे सात वर्षे नेतृत्व केले.
यादरम्यान, भारत जगातील नंबर एकचा संघ बनला. मात्र, त्याला मिळत असलेले यश अनेकांच्या डोळ्यात खूपत होत व म्हणूनच हे सर्व घडले. भारतीय क्रिकेटसाठी ही गोष्ट चांगली नाही हे येणारा काळच सांगेल, असेही ते म्हणाले.