पुणे – भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जुगलबंदी कायम सुरू असते. मात्र माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसा यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्षाविषय़ी केलेल्या विधानाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाचार घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सध्या प्रचारदौऱ्यावर असलेल्या फडणवीसांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला. राष्ट्रवादी काँग्रेस हा गल्लीतील पक्ष म्हणत फडणवीसांनी खिल्ली उडवली. तसेच शरद पवारांना गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचं त्यांनी नमूद केलं. यावरून अजित पवारांनी चोख प्रत्युत्तर दिलं.
शरद पवार यांची उंची आणि देशपातळीवरील त्यांचं काम पाहून नव्या पीढीने बोलताना तारतम्य पाळलं पाहिजे, अशा शब्दात अजित पवार यांनी फडणवीसांना खडसावलं.
दरम्यान महाराष्ट्रासंदर्भातील जे काही असेल ते मला विचारा, मी त्याचं उत्तर देतो. देशपातळीवरच्या राजकारणात आमचे वरिष्ठ बोलतात. कुणालाही कमी-जास्त लेखण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येकजण आपआपल्या परीने काम करत तिथपर्यंत पोहचला आहे, असंही अजित पवारांनी म्हटलं.